नोकरी मेळावा युवा पिढीसाठी दिशादर्शक ठरणार ः आ. डॉ. तांबे श्रीरामपूर येथे आमदार लहू कानडेंच्या प्रयत्नांतून नोकरी मेळावा
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने आमदार लहू कानडे यांनी मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला. प्रामुख्याने तालुक्याला चोहोबाजूने जोडणार्या रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी अनेक कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काळात नवीन उद्योगधंदे येण्यास चालना मिळणार आहे. गेल्या काही वर्षात तरुण युवक युवतींवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. हा मुद्दा हाती घेऊन आमदार कानडे यांनी नोकरी मेळाव्याच्या रुपाने नवतरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. येणार्या काळात युवा पिढीसाठी हा मेळावा दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
श्रीरामपूर येथील लक्ष्मी त्र्यंबक कार्यालयात झालेल्या नोकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल दवंगे, समाज कल्याण अधिकारी राधाकृष्ण देवढे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, माजी सभापती वंदना मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक कानडे, जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शीतल लहारे, विष्णूपंत खंडागळे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, अंजुम शेख, राजेश अलघ, मुख्तार शाह, कलीम कुरेशी, जयशी शेळके, जिल्हा काँग्रेसचे सचिव अॅड. समीन बागवान, डॉ. नितीन आसने, अॅड. विलास थोरात, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, प्रभात उद्योग समूहाचे सारंगधर निर्मळ, चैतन्य उद्योग समूहाचे संतोष कानडे, अभिजीत लिप्टे, सोमनाथ पाबळे, दिनेश देवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमीत्ताने उपस्थितांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले.
यावेळी आमदार कानडे म्हणाले की, नामदार थोरात व आमदार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाच्या विकासाबरोबरच युवकांच्या रोजगाराचा प्रश्न हाती घेऊन नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यासाठी जवळपास 4500 हजारहून अधिक युवक-युवती मेळाव्यासाठी उपस्थित होते. युवकांसाठी रोजगाराच्या संधी मिळावी यासाठी एमआयडीसीत नामांकित कंपन्या आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सत्यजीत तांबे, प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सारंगधर निर्मळ यांनी यशोगाथा सांगून युवकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रसन्ना धुमाळ यांनी केले. प्रास्ताविक अरुण नाईक यांनी केले. अॅड. समीन बागवान यांनी आभार मानले. ब्रिटानिया, महिंद्रा, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, व्हील्स इंडिया, विडसम एन्टरप्रायजेस, आयसीआयसीआय बँक, व्हेरॉक, उज्जीवन फायनान्स, डेक्कन प्लास्टिक, बीएसए कॉर्पोरेशन लि., डीएमसीएफएस स्कील फाऊंडेशन यांच्यासह कंपन्यांचे प्रतिनिधी मेळाव्यास उपस्थित होते. या कंपन्यांच्या आयोजनासाठी किरण राहणे व दीपक पवार यांनी परिश्रम घेतले.