संगमनेर फेस्टिव्हलचा प्रत्येकाला अभिमान ः डॉ.जयश्री थोरात दिमाखदार सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलचा शानदार शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणामुळे दोन वर्षांचा खंड पडलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यापासूनच संगमनेरातही हा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरु झाली जी आजही अव्याहतपणे कायम आहे. मागील 14 वर्षांपासून राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असलेल्या संगमनेर फेस्टिव्हलचे आयोजन करीत आहे. हा महोत्सव आज राज्यभर गाजत असून प्रत्येक संगमनेरकर नागरीकाला त्याचा अभिमान वाटावा अशा दिमाखात तो साजरा होत असल्याचे प्रतिपादन एकविरा फौंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात यांनी केले.

संगमनेर येथील राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलचा त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष रोहित मणियार, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, सचिव आशिष राठी, उमेश कासट यांच्यासह शहरातील मानाच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ. थोरात म्हणाल्या की, संगमनेर शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यामुळे संगमनेरात बदलून आलेले शासकीय अधिकारी येथील सेवेनंतरही कायमचे संगमनेरकरच होवून जातात. येथील विविध संस्था, मंडळे व व्यक्तींकडून शहराची सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे मोठे काम घडत असते. गेल्या 14 वर्षांपासून राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाकडून आयोजित होणारा संगमनेर फेस्टिव्हलने तर केवळ संगमनेरच नव्हेतर संपूर्ण राज्यात लौकीक मिळवला आहे. ज्या महोत्सवाने राज्यात आपला मानदंड निर्माण केला आहे, अशा महोत्सवाला उपस्थित राहता येणं ही आपल्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राजेश मालपाणी यांनी दोन वर्षांच्या निर्बंधानंतर सर्वाधीक उत्सुकता लागून असलेला महोत्सव अशा शब्दांत संगमनेर फेस्टिव्हलचे कौतुक केले. प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर गेल्या 14 वर्षांपासून साजर्या होणार्या संगमनेर फेस्टिव्हलची दरवर्षी उंची वाढत असल्याचे सांगितले. मनीष मालपाणी यांनी प्रास्ताविकात फेस्टिव्हलचा गेल्या चौदा वर्षांचा प्रवास उलगडला. संगमनेरकर प्रेक्षक अतिशय रसिक असल्याने दरवर्षी फेस्टिव्हलमधील कार्यक्रमांची निवड करताना ते दर्जेदारच असतील याची काळजी घ्यावी लागते असेही ते म्हणाले. दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात निघणार असल्याने प्रशासनाने रात्री बारानंतर पारंपारिक वाद्यांसह मिरवणुकीतील गणेश मंडळांना मार्गस्थ होण्याची परवानगी द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार यांनी स्वागत केले. रमेश घोलप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सम्राट भंडारी यांनी आभार मानले.

फेस्टिव्हलच्या शुभारंभप्रसंगी संगमनेरातील मल्हार ढोलताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. चंद्रशेखर कानडे व त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक साहसी खेळांचे प्रदर्शन केले. मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनी तालबद्ध पद्धतीने संचलन करीत फेस्टिव्हलची ज्योत आणली. मनीष मालपाणी यांच्या हस्ते ती उद्घाटक डॉ. जयश्री थोरात यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत संगमनेर फेस्टिव्हलचा शानदार शुभारंभ झाला. यावेळी संगमनेर डान्स स्टुडिओच्या कलाकारांनी उत्कृष्ट स्वागतनृत्यही सादर केले.

संगमनेर फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध मराठी विनोदवीर सारंग साठ्ये व सिद्धांत बेलवणकर यांच्या धमाल विनोदाचा कार्यक्रम सादर झाला. रोजच्या जीवनातील विविध प्रसंग एकत्रित करीत त्यातून घडणार्या गंमतीजमती ऐकताना मालपाणी लॉन्सच्या प्रशस्त प्रांगणात क्षणाक्षणाला हास्याचे फवारे उडत होते.
