खडकाळ माळरानावर तिघा बंधूंनी फुलवली आमराई! ढोरवाडी येथील शेतकर्‍यांची यशोगाथा; तीन हजार केशर आंब्याची लागवड

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील ढोरवाडी येथील तिघा शेतकरी बंधूंनी खडकाळ माळरानावर साडेतीन एकर क्षेत्रात तीन हजार दोनशे केशर आंब्यांची लागवड केली आहे. ही आमराई अतिशय टवटवीत दिसत असल्याने अनेकांना भूरळ घालत आहे. तर तरुण शेतकर्‍यांना प्रेरणा देत आहे.


मूळात पठारभागातील शेतकर्‍यांना कायमच दुष्काळाशी दोन हात करावे लागतात. तरीही शेतकरी विविध संकटांवर मात करत शेती करतात. त्यातही अनेकदा बाजारभाव नसल्याने हंगाम वाया जातो. तरी देखील ढोरवाडी येथील कारभारी मोरे, आप्पासाहेब मोरे, भिकाजी मोरे या तिघा शेतकरी बंधूंनी खडकाळ माळरानावरील साडेतीन एकर क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी तीन हजार दोनशे केशर आंब्याची रोपे लावली होती. सध्या ही झाडे जोमाने वाढली असून अतिशय टवटवीत दिसत आहे.

मात्र, या आंब्याच्या झाडाला पाणी टंचाईचा फटका बसू नये म्हणून मोरे बंधूंनी दीड एकर क्षेत्रात माती तलाव बांधला त्यातून पाईपलाईनद्वारे पाणी घराजवळ असलेल्या शेततळ्यात आणून सोडले आहे. त्यानंतर ठिबकद्वारे ते आमराईला पाणी देत आहे. सध्या अनेक झाडांना मोठ्या प्रमाणात बहर आला आहे. त्यातच ही आमराई रस्त्याच्या कडेलाच असल्याने अनेकजण हमखास थांबून याबद्दल माहिती घेत आहेत. यंदाच्या हंगामात निसर्गाने साथ दिल्यास नक्कीच चांगले उत्पादन मिळेल, असा विश्वासही मोरे बंधूंनी व्यक्त केला आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कांदा, डाळिंब आदी पिके घेत होतो. मात्र आता आम्ही सेंद्रीय शेतीकडे वळालो आहेत. त्यानुसार आम्ही तिघा बंधूंनी आमराई फुलवली आहे.
– भिकाजी मोरे (आंबा उत्पादक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *