शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी मिरवणुकांसह मोठ्या कार्यक्रमांना मनाई; करोना नियम पाळण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, नगर
राज्यात करोना प्रादुर्भाव कमी होत असून अनेक निर्बंधही शिथील करण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी 19 फेब्रुवारीला साजर्या केल्या जाणार्या शिवजयंतीला मिरवणुका काढण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. शिवजयंतीसंबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्यानुसार विविध किल्ल्यांवरून काढण्यात येणार्या शिवज्योत दौड आणि उत्सवाला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अन्यत्र मिरवणुका, प्रभात फेरी, रॅली आणि मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन, गर्दी करून उत्सव साजरा न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून त्याचे काटेकोर पालन करावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण करण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यातून करोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्याठिकाणी करोनासंबंधीचे नियम पाळावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

कोणत्या गोष्टींना मुभा देण्यात आली?
शिवज्योती दौडमध्ये 200 कार्यकर्त्यांना सहभागी होता येणार आहे. याशिवाय शिवयजयंती उत्सवासाठी 500 जणांना परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी गड किल्ल्यांवर मध्यरात्री जाऊन शिवजयंती साजरी करण्यास मात्र परवानगी नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेणे आवश्यक असून शिवप्रेमींनी सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
