हरेगाव फाट्यावर अपघाताची मालिका सुरूच! तातडीने गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील हरेगाव फाटा परिसरामध्ये वारंवार अपघाताची मालिका सुरू आहे. रस्ता रुंदीकरण, नूतनीकरण अशा विविध स्वरूपाची कामे सुरू असून यामध्ये हरेगाव फाटा व अशोकनगर फाटा याठिकाणचे गतीरोधक बुजवून गेले आहे. त्यामुळे या रस्त्यावर गतीरोधक बसविण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. तरी या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हरेगाव फाटा याठिकाणी दोन्ही बाजूने मोठमोठे गतीरोधक होते. सध्या प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरण, नूतनीकरण अशा विविध स्वरूपाची कामे सुरू असून यामध्ये हरेगाव फाटा, अशोकनगर फाटा याठिकाणचे गतीरोधक बुजवून गेले आहे. यामुळे याठिकाणी वारंवार अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे, या अपघातामध्ये दुखापत होऊन वादास सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.

यासंदर्भात प्रशासनास वेळोवेळी लेखी व तोंडी माहिती देऊनही सदर गतीरोधकबाबत संबंधित विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण पसरला आहे. दररोज दिवसभरात एक ते दोन अपघात याठिकाणी होत असतात तरी संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन हरेगाव फाटा याठिकाणी गतीरोधक बसवावेत अशी मागणी सरपंच आबासाहेब गवारे, राजाराम गवारे, मुनीर सय्यद, सागर गवारे, गणेश गवारे, संदीप गवारे, बबलु गवारे, राजेंद्र देसाई, सुधाकर ससाणे आदिंनी केली आहे.
