निळवंडेच्या पाणी वाटपाचा जुना वाद पुन्हा उफाळला! शिर्डी व कोपरगावला पाणी देण्यास लाभक्षेत्राचा विरोध

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नगर-नाशिकहून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याची वेळ आली नाही. त्यामुळे त्यावरून होणारा पाणी वाटपाचा वाद टळला आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात निळवंडे धरणाच्या पाणी वाटपाचा जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. निळवंडे धरणाचे पाणी शिर्डी व कोपरगाव शहरांसाठी देण्यात येऊ नये, अशी मागणी भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर दुसरीकडे पाण्यावरील हक्क का सोडायचा असे म्हणत कोपरगाव पाणी जनआंदोलन समितीनेही यासाठी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.

प्रवरा नदीवर हे धरण आहे. त्यातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे शिर्डी व कोपरगावला पाणी नेण्याची योजना आहे. एकीकडे कालव्यांची कामे अद्याप सुरू असल्याने धरणाच्या लाक्षक्षेत्रातील शेतकर्यांनाही या धरणाचा अद्याप पुरेसा लाभ झाला नाही. त्यातच शिर्डी-कोपरगावला पाणी देण्याची योजना आली आहे. त्यावरून हा संघर्ष सुरू आहे. अर्थात त्याला राजकीय कंगोरेही आहेत. निळवंडे धरणावरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील श्रेयवादाचे आणि आरोप-प्रत्यारोपाचे राजकारणही सुरूच असते.

या पार्श्वभूमीवर निळवंडे धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे शहराला रोज मिळणार्या स्वच्छ व शुद्ध 1 कोटी 33 लाख लिटर पाण्यावर हक्क सोडायचा का? असा सवाल करणारे फलक कोपरगाव पाणी जनआंदोलन समितीच्या नावाने कोपरगाव परिसरात लावण्यात आले आहेत. त्यांनी या पाण्यावर हक्क सांगण्यास सुरुवात केल्याने श्रीरामपूर, राहुरी, राहाता व नेवासा तालुका या भागातील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीनेही पाणी देण्यास विरोध सुरू केला आहे. समितीचे सदस्य सुरेश पांडुरंग ताके, जितेंद्र भोसले, रामचंद्र पटारे, भरत आसने, दिलीप गलांडे, किशोर पाटील, ईश्वर दरंदले, संदीप गवारे, महेश लवांडे, रावसाहेब गलांडे, संजय नाईक यांनी कोपरगावकरांच्या भूमिकेवर आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.
![]()
या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी व कोपरगाव शहरांना पिण्यासाठी निळवंडे धरणामधून पाणी पुरवठा करण्यासंदर्भात अधूनमधून मागणी होत असते. स्थानिक वर्तमानपत्रात यासंदर्भात चर्चा आहे. पण, शिर्डी व कोपरगाव ही दोन्ही शहरे निळवंडे लाभक्षेत्रातील नसून दारणा धरणाच्या लाभक्षेत्रातील आहेत. त्या धरणात शिर्डी व कोपरगाव शहरांसाठी पाणी राखीव आहे. ब्रिटीश सरकारने दारणाच्या उजव्या कालव्यावर चितळी (ता. राहाता) येथे छोटा बंधरा प्रस्तावित केला होता. तो तलाव करून दोन्ही शहरांचा व परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो आणि त्यांना निळवंडेतून पाणी देण्याची गरज पडणार नाही. निळवंडे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे कमी पावसाचे आहे. त्यामुळे शिर्डी व कोपरगावला पिण्यासाठी शाश्वत पाणी पुरवठा दारणा धरणातून शक्य आहे. त्यामुळे आम्ही भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे सर्व सदस्य गोदावरीसारख्या मोठ्या नदीच्या खोर्यात छोटी उपनदी असलेल्या प्रवरेतून पाणी देण्यास तीव्र विरोध करीत आहोत, अशी भूमिका पत्रात घेण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात निळवंडेच्या पाणी वाटपाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
