सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र सरकारला जाग ः थोरात
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता.7) अखेर देशातील लसीकरणाची जबाबदारी घेतली हा निर्णय चांगला आहे. परंतु हा निर्णय घेण्यास उशीर झाला आहे. राज्यांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे राहिलेल्या मोदी सरकारला सर्वोच्च सरकारने धारेवर धरून लसीकरण मोहिमेची सर्व माहिती मागवताच केंद्र सरकारला जाग आली आणि आज केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतली, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

देशात आत्तापर्यंत ज्या लसीकरण मोहिमा झाल्या त्यांची जबाबदारी केंद्र सरकारांनीच घेतली होती. परंतु मोदी सरकारने आपली जबाबदारी राज्यांवर ढकलून पळ काढला होता. काँग्रेस पक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांनी हा मुद्दा लावून धरला. देशभरातून केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणांवर टीका होऊ लागली आणि सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर आता नाईलाजाने लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. आता केंद्राने जबाबदारी घेतलीच आहे तर ती नीट पार पाडावी हीच अपेक्षा आहे, असे महसूल मंत्री थोरात यांनी म्हटले आहे.

कोविन अॅप्लिकेशनमध्ये अजूनही अडचणी आहेत. जिल्हा ओलांडून लोक लसीकरणासाठी जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष तयार होतो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे या त्रुटी दूर करून केंद्राने लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणावी. महाराष्ट्र सरकार त्यासाठी केंद्राला पूर्ण क्षमतेने मदत करेल.
– बाळासाहेब थोरात (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य)
