धारणगाव येथील शेतकर्याचा तळ्यासोबत व्हिडिओ व्हायरल

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील धारणगाव येथील बापू दादा चव्हाण या शेतकर्याने एका व्हिडिओद्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीमुळे कालव्याच्या गळतीचे पाणी चव्हाण यांच्या शेतात येते. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी त्यांच्या शेतीला तळ्याचे स्वरूप येते. अनेकदा पाठपुरावा करूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा इशारा देणारा व्हिडिओ केला असून तो व्हायरल होत आहे.

चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर शेती आहे. मात्र, ऐन माशगतीच्या वेळी त्यात तळे साचत असल्याने पुढील पिके घेता येत नाहीत. त्यातून लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. त्यांनी जलसंपदा विभागाला यासाठी जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘चारीतून चुकीच्या पद्धतीने पाणी सोडले जाते. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून माझ्या शेतात पाणी साठते. जेथे पाणी जाऊ शकत नाही, तेथे ते बळजबरीने नेऊन इतरांची मोठमोठी शेततळी भरली जातात. त्यासाठी दीर्घकाळ पाणी सुरू राहते. त्यामुळे आपल्या शेतात पाणी साठते. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. उन्हाळ्यात माशगत करून पुढील पिकासाठी शेत तयार केले की, हे पाणी येते. बराच काळ हे पाणी साठून राहत असल्याने आपले मोठे नुकसान होते. यामुळे कर्जबाजारी झालो आहे. आपल्यासह आणखी काही शेतकर्यांना हा त्रास होत आहे.’ शिर्डीजवळ चारीत बिघाड झाला आहे. आपण तो अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, त्याच्या दुरुस्तीचे काम केले जात नाही. दरवर्षी मेहनत करून शेत तयार करायचे आणि नंतर पाणी आल्यावर नुकसान सहन करायचे, असा प्रकार सुरू आहे. एकदा पाणी साठले की पुढील तीन-चार महिने हे पाणी साठून राहते. पावसाळ्यात समजू शकतो, मात्र उन्हाळ्यातही एखाद्या तळ्याप्रमाणे शेतात पाणी साठून राहत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
