‘नवी शिर्डी’ नामकरण करुन जिल्ह्याचे विभाजन करा ः वाकचौरे भाजपच्या सोशल मीडिया सेलची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळाजवळ नवीन शहर वसविण्याची संकल्पना मांडून त्यासंबंधी पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम या घोषणेचे अहमदनगरमधील जाहीर कार्यक्रमात स्वागत केले होते. आता भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनीही याचे स्वागत केले आहे. या नव्या शहराला ‘नवी शिर्डी’ असे नाव द्यावे आणि अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून या शहरात उत्तर जिल्ह्याचे मुख्यालय करावे, अशी मागणीही भाजपकडून पुढे आली आहे.

भाजपच्या सोशल मीडिया सेलचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. या शहराला नवी मुंबई, नवी दिल्लीच्या धर्तीवर नवी शिर्डी असे नाव द्यावे आणि उत्तर जिल्ह्याचे मुख्यालय तसेच पर्यटन जिल्हा घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे अहमदनगरचा मागे पडलेला जिल्हा विभाजनाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत येणार आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर अहमदनगर जिल्ह्यातून कोणत्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

भाजपच्या सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष असलेल्या वाकचौरे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांकडेच ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘नवीन शहर वसविण्याचे घोषित केले. त्याचा अतिशय चांगला उपयोग होईल. हे शहर निर्माण करताना जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक असणार्या सुविधा निर्माण करता येतील. हे शहर कोपरगाव, राहाता, संगमनेर तालुक्यांच्या सरहद्दीवर असेल. जिल्ह्यासाठी अग्रेसर असणारे श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव या तालुक्यापासून समान अंतरावर असणार आहे. नवीन जिल्हा शिर्डी विमानतळाजवळ होणार असून दौंड-मनमाड रेल्वे मार्ग जवळ आहे. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग जवळ असून समृद्धी महामार्गही येथून जात आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा महामार्ग येथून जातो. शिवाय प्रस्तावित सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग येथून जाणार आहे. यामुळे हवाई, रेल्वे, भूमार्गच्या दृष्टीने परिपूर्ण जिल्हा असेल. हा पर्यटन समृद्ध जिल्हा होईल. नवीन तयार होणारे शहर हे उत्तर नगर जिल्ह्याचे केंद्र करून शिर्डी हा नवीन जिल्हा करावा आणि पर्यटन जिल्हा म्हणून त्याचा विकास करावा.’ असे या निवेदनात म्हटले आहे. याच्या प्रती जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकार्यांनाही देण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधींकडेही यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.
