कोरोना उपाययोजनांत राज्य सरकारची केवळ चमकोगिरी ः विखे
कोरोना उपाययोजनांत राज्य सरकारची केवळ चमकोगिरी ः विखे
पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, राहाता
‘कोरोनासंबंधी ज्या उपाययोजना केल्या जात आहे, त्यात सरकारची केवळ चमकोगिरी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारचेच आरोग्य ठिकाणावर नाही. त्यामुळे सामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे,’ अशी टीका भाजपचे नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांना शासकीय यंत्रणेने उपचारांबाबत योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य केले नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करून विखे यांनी ही टीका केली आहे. कोरोनासंबंधी सुविधा देताना महाविकास आघाडी सरकारची फक्त चमकोगिरी सुरु आहे. प्रत्यक्षात सामान्य माणसाला कोणत्याही आरोग्य सुविधा मिळत नसल्याने वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पत्रकार रायकर यांचा मृत्यू हा शासकीय अनास्थेचाच बळी आहे. पुण्यासारख्या शहरातही त्यांना रुग्णवाहिकेची सुविधा मिळू नये, ही सरकारी व्यवस्थेची शोकांतिका आहे. असं ते म्हणाले.

कोरोना संकटाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने केवळ मोठमोठ्या घोषणा केल्या. रुग्णालये आणि त्यामधील बेडबाबत फक्त आकडेवारी जाहीर करुन स्वत:ची चमकोगिरी करुन घेतली. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही आरोग्याच्या सुविधा सामान्य माणसाला मिळत नाहीत. आरोग्य व्यवस्थेवर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. सरकारच्या हलगर्जीपणामुळे निरपराध व निष्पाप लोकांचा बळी जात आहे. त्यामुळेच कोरोना संकटातील बळींच्या संख्येत राज्याचा क्रमांक वरच्या स्थानावर आला आहे. समाजासाठी धावणार्या पत्रकारालाच उपचार मिळू नयेत, हे अतिशय दु:खद आहे. हा शासकीय व्यवस्थेच्या अनास्थेचाच बळी असून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही विखे यांनी केली आहे.

