कृषी कायदे मागे घेण्यासाठी नेवाशात आंदोलन

नायक वृत्तसेवा, नेवासा
शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे, अशी मागणी करत भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने नेवासा येथे आज (शुक्रवार ता.26) आंदोलन करुन ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला.

भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे प्रमुख बाबा अरगडे, बन्सी सातपुते यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात काँग्रेस कमिटीचे नेवासा तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, समन्वय समितीचे आप्पासाहेब वाबळे, डॉ.बापूसाहेब अढांगळे, दत्तात्रय गोंधळी, दत्ता देवरे, लक्ष्मण कडू, एल.एस.शिंदे, प्रवीण तिरोडकर सहभागी झाले होते. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी सरकारने तीन काळे कायदे केले. त्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांनी 26 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले. त्याला आज 121 दिवस झाले. यामध्ये 300 पेक्षा जास्त शेतकर्यांनी आपला जीव गमावला आहे. केंद्र सरकार शेतकर्यांच्या आंदोलनाच्या बाबत अडेलतट्टूपणाची भूमिका घेत आहे. पंतप्रधानांनी याबाबत एकही शब्द उच्चारलेला नाही. या आंदोलनाबाबत केंद्र सरकार अतिशय असंवेदनशील आहे. कायदे करताना सर्व संसदीय परंपरांची गळचेपी करण्यात आली आहे असे निवेदनात म्हटले आहे.
