दिगंबर पाणी पुरवठा योजनेसाठी सहा लाखांची तरतूद ः मेंगाळ
नायक वृत्तसेवा, अकोले
दिगंबर गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 6 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याने अनेक वर्षांपासून विस्थापित झालेल्या गावची मागणी पूर्ण होणार असल्याची माहिती अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी दिली.
निळवंडे धरणाच्या निर्मितीनंतर पाणलोट क्षेत्रात आकंठ बुडालेले दिगंबर गाव धरणाच्या सभोवताली विस्थापित झाले. मात्र ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती या गाची झाली होती. धरणाची निर्मिती होण्याच्या अगोदरच या गावाला सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. अखेर विस्थापित झालेल्या दिगंबर ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा संपली असून पाणी पुरवठा योजनेसाठी 6 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात पंचायत समिती सेस फंड 15 वित्त आयोगातून 4 लाख व ग्रामपंचायत 15 वित्त आयोगातून 2 लाख असे एकूण 6 लाख रुपयांची तरतूद केली असून मार्चअखेर या योजनेच्या कामाला सुरूवात होणार आहे.