वांबोरी चारीबाबत शेतकर्‍यांना दिलेले वचन पूर्णत्वाकडे जाणार ः पोटे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासोबत जलसंपदा अधिकार्‍यांची बैठक

नायक वृत्तसेवा, नेवासा
राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांची मंत्रालयात जाऊन बैठक घेतली. यामध्ये वांबोरी चारीबाबत शेतकर्‍यांना दिलेले वचन पूर्णत्वाकडे जाणार असल्याची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना अभिजीत पोटे म्हणाले, दिनांक 19 जानेवारी रोजी मुंबई येथे मंत्रालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाच्या दालनात नेवासा तालुक्यातील वांबोरी चारी शेती सिंचनापासून वंचित असणार्‍या बारा गावांना वांबोरी चारीत सामाविष्ट करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव (लक्षवेधी), सचिव (प्रकल्प समन्वयक), मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक, अधीक्षक अभियंता नाशिक पाटबंधारे मंडळ नाशिक, अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर, कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर, कार्यकारी अभियंता अहमदनगर मध्यम प्रकल्प विभाग अहमदनगर आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेवासा तालुका उपाध्यक्ष संजय वाघ, जिल्हा समन्वयक महादेव आव्हाड, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, ज्ञानेश्वर सांगळे उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सुरुवातीलाच विषयाची मांडणी करताना शेती सिंचनाचे पाणी मिळवण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलने झाली आश्वासने मिळाली. मात्र आजपर्यंत पाटबंधारे विभागाने काहीच हालचाली केल्या नाही. येथून मागच्या सरकारमधील जलसंपदा विभागाच्या आडमुठे धोरणामुळे लाभ क्षेत्रातील पांगरमल, राजेगाव, मांडेगव्हाण, मोरगव्हाण, वाघवाडी, झापवाडी, लोहगाव, शिंगवे तुकाई अशी गावे जाणीवपूर्वक वगळली आणि वांबोरी चारी ते वाघवाडी शेती सिंचनासाठी असलेली पाईपलाईन तलाव क्रमांक 38 आणि 39 सुरू होण्यापूर्वीच नादुरुस्त असल्याचे सांगितले. यावर बोलताना नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता त्यांनी 102 तलावात आणखी बंधारे किंवा तलाव जोडणे शक्य नसल्याचे सांगितले.
त्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जलसंपदाच्या अधिकार्‍यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योजनेकडे बघावे. वांबोरी चारी पाईपलाईन योजनेच्या फुटबॉलची खोली कशी वाढवता येईल, धरणातील गाळ काढून जलसाठा वाढवता येईल का?, मुळा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून वाया जाणार्‍या अतिरिक्त पाण्याचे काटेकोर नियोजन करा आणि पावसाळ्यामध्ये मुळा धरण ओव्हरफ्लो होत असताना या वंचित असणार्‍या गावांचे बंधारे कसे भरता येतील, या गावांच्या एका बाजूने वांबोरी पाईपलाईन जाते व दुसर्‍या बाजूने काही अंतरावरून मुळा धरणाचा कालवा जातो यामधून शेतीला सिंचनासाठी कसे पाणी देता येईल याचे नियोजन करा आणि पाटपाणी चालू असताना ड्रोनद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करा, तात्काळ मुळा धरणाची पाटपाण्याची समिती स्थापन करा व सर्वेक्षण अहवाल तात्काळ एक महिन्याच्या आत सादर करा असे अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांना असे समक्ष आदेश कडू यांनी दिले. या कामासाठी तात्काळ निधीची तरतूद केली जाईल, असेही सांगितले.

वांबोरी चारीतून या सर्व गावांना शेती सिंचनासाठी पाणी मिळवून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे दोन वर्षांपासून अथक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे तीन-चार हजार शेतकर्‍यांना घेऊन जनावरांसह मोठा रास्ता रोको केला होता. अखेर जलसंपदा राज्यमंत्री कडू यांनी त्यांची दखल घेऊन तात्काळ मंत्रालयात बैठक लावून ही योजना सकारात्मक दृष्टीने कशी पूर्ण करता येईल, लवकरात लवकर शेती सिंचनासाठी पाणी कसे देता येईल असे बैठकीत ठरले आहे.

Visits: 130 Today: 1 Total: 1113846

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *