शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात मोर्चा समविचारी शेतकरी संघटनांचा सहभाग; केंद्र सरकारचा केला तीव्र निषेध

नायक वृत्तसेवा, अकोले
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशस्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (ता.3) महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना व कामगार संघटनानी राज्यभर आंदोलन करण्याची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या राज्य कौन्सिलने दिली होती. समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत अकोले येथे समविचारी शेतकरी संघटनांनी भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध केला. तहसील कार्यालयात शेतीमाल ओतून यावेळी शेतकर्यांनी आपला संताप व्यक्त केला.

अकोले तहसील कार्यालयात ओतलेला शेतीमाल तहसीलदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पंतप्रधानांना शेतकर्यांना त्यांच्या घामाचे दाम न देताच शेतीमाल हवा आहे. तीन कायदे करून व शेतकरी विरोधी धोरणे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांना हमीभाव नाकारून एकप्रकारे घामाचे दामच नाकारत आहेत. आमची लूटमार व्हावी अशी धोरणे घेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर लुटता कशाला फुकटच घ्या म्हणत अकोल्याच्या शेतकर्यांनी या मोर्चाद्वारे पंतप्रधान मोदींना शेतीमाल पाठविला आहे. दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या दडपशाहीचा यावेळी झालेल्या सभेत शेतकर्यांनी तीव्र शब्दांत धिक्कार केला. दिल्ली येथील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकर्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीद आंदोलकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या झेंड्याखाली निघालेल्या या मोर्चात किसान सभा, राष्ट्रसेवा दल, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, छात्रभारती, विद्रोही विद्यार्थी संघटना, संभाजी ब्रिगेड, माकप, भाकप, सिटू कामगार संघटना, रिपब्लिकन पार्टी यांसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. डॉ.अजित नवले, दशरथ सावंत, आमदार डॉ.किरण लहामटे, कारभारी उगले, विनय सावंत, सदाशिव साबळे, महेश नवले, डॉ.संदीप कडलग, नामदेव भांगरे, सुरेश नवले, सोमनाथ नवले, भानुदास तिकांडे, एकनाथ मेंगाळ, राजू कुमकर, विनोद हांडे, शांताराम संगारे, स्वप्निल धांडे आदिंची यावेळी भाषणे झाली. शेतकरी आंदोलन यशस्वी करण्यासाठी अखंड प्रयत्न करण्याचा संकल्प आंदोलकांनी व्यक्त केला.

