विखेंची राज्याला गरज असून त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे ः सत्तार
विखेंची राज्याला गरज असून त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे ः सत्तार
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भाजप नेते राधाकृष्ण विखेंना शिवसेनेत येण्याची ऑफर
नायक वृत्तसेवा, राहाता
महाविकास आघाडी सरकारमधील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. विखे यांच्यासारख्या नेत्याची राज्याला गरज असून विखेंनी राज्याचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षाही सत्तार यांनी बोलून दाखविली.

राज्यमंत्री सत्तार एका लग्न समारंभासाठी राहाता तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी लोणी येथे विखे यांची निवासस्थानी भेट घेतली. सत्तार व विखे यांची जुनी मैत्री आहे. सत्तार हे विखे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यामुळे विखेंपाठोपाठ त्यांनीही काँग्रेस सोडली होती. मधल्या काळात राजकीय समीकरणे बदलली. सत्तार यांना मंत्रिपद मिळाले, तर विखे यांना विरोधी पक्षात बसावे लागले आहे.

या पार्श्वभूमीवर सत्तार व विखे यांच्या भेटीकडे लक्ष लागले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले की, आपली व विखे यांची जुनी मैत्री आहे. आपण एक कार्यकर्ता आहोत. माझे आणि विखे पाटलांचे वीस वर्षांपासूनचे पारिवारिक संबंध आहे. सध्या राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राजकीय परिस्थिती कशीही असली तरी संपर्क आणि संबंध कधी वाया जात नाही. माझी अशी इच्छा राहील की विखे पाटील यांनी शिवसेनेत यावे आणि राज्याचे नेतृत्व करावे. विखे यांना मी केवळ शिवसेनेत येण्याची ऑफर देत आहे. शिवसेनेत आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतात. त्यांचा निर्णय आम्हांला सर्वांना मान्य राहील. विखे पाटील यांचे शिवसेनेशी जुने संबंध आहेत. त्यांचे वडील स्व.बाळासाहेब विखे पाटील आणि आणि स्वत: विखेही काही काळ शिवसेनेत होते. त्यांना शिवसेनेचा अनुभव आहे. राज्य सरकारमध्ये अशा नेत्यांची गरज आहे. यासाठी आपण पक्षप्रमुखांशी संपर्क करणार आहोत, असेही सत्तार यांनी सांगितले.

आता सत्तार यांच्या या ऑफरला विखे स्वत: कसा प्रतिसाद देतात आणि शिवसेनेचे नेतृत्व त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. विखे काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये आलेले असले तरी त्यांनी शिवसेनेसोबतचे संबंधही चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शिवसेनेतील त्यांच्या प्रवेशासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

श्रीरामपूर येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करायचे होते. हा कार्यक्रम ग्रामविकास विभागाचा आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांना याठिकाणी बोलवले होते. सत्तार यांचा आणि माझा अनेक वर्षांचा स्नेह असून या कार्यक्रमाला येण्याची मी त्यांना विनंती केली, त्यांनी ती विनंती मान्य केली. त्यामुळे येथे दुसरा कोणत्याही चर्चेचा मुद्दा नाही.
– राधाकृष्ण विखे पा. (भाजप नेते)

