नाभिक संघटनांचे विविध मागण्यांबाबत तहसीलदारांना निवेदन

नाभिक संघटनांचे विविध मागण्यांबाबत तहसीलदारांना निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, भाई कोतवाल नाभिक सेवा संघ व युवक संघटना यांच्यावतीने नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सुभाष कदम यांना देण्यात आले.

सदर निवेदनात म्हंटले आहे की, सन 2021 ची सार्वत्रिक जनगणना केंद्र सरकार जातीनिहाय करणार नसेल तर महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात जातीनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाची ओबीसींत गणना करू नये, कोणत्याही परिस्थितीत ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश होऊ नये, पुढे ढकलण्यात आलेल्या इतर सर्व भरती तसेच एम.पी.एस.सी. व अन्य सर्व प्रकारच्या परीक्षा कोणाच्याही दबावाची पर्वा न करता ताबडतोब घेण्यात याव्यात. इयत्ता अकरावीची व इतर प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू करावी, शासकीय सेवांमधील ओबीसींचा अनुशेष लवकरात लवकर भरावा, कोणत्याही कारणास्तव मेगा भरती न थांबता ती ताबडतोब करावी, तत्पूर्वी दिनांक 22 ऑगस्ट, 2019 रोजी बिंदूनामावलीला दिलेली स्थगिती उठवावी, ओबीसींच्या महाज्योती या संशोधन प्रशिक्षण संस्थेसाठी एक हजार कोटींची तरतूद करून सुरुवात करावी, बारा बलुतेदारांच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी महामंडळालाही निधी द्यावा आणि त्यासाठी असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात आदी विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी नायब तहसीलदार कदम यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ संगमनेर तालुकाध्यक्ष बाबा जाधव, शहराध्यक्ष रमेश सस्कर, अशोक सस्कर, कचरू भालेकर, वैभव बिडवे, संजय बिडवे, विजय रायकर, श्याम बिडवे, सुधीर कोल्हाळ, गोरख शिंदे आदी उपस्थित होते.

 

Visits: 243 Today: 1 Total: 1848084

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *