जयहिंदचे पर्यावरण संवर्धनाचे काम कौतुकास्पद : अप्पर आयुक्त आंधळे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगी गडावर जयहिंद लोक चळवळीच्या वतीने ५५ हेक्टर क्षेत्रामध्ये ५५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद लोकचळवळ पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आयकर अप्पर आयुक्त भरत आंधळे यांनी काढले.

वणी येथील सप्तशृंगी गडावर महाराष्ट्र शासन वनविभाग नाशिक एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सप्तशृंगी गडावरील रतनगड परिसरामध्ये ५५ हेक्टर क्षेत्रामध्ये ५५ हजार देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

यावेळी आयकर विभागाचे अपर आयुक्त भरत आंधळे ,जयहिंदचे संस्थापक माजी आ. डॉ.सुधीर तांबे, वनविकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक उमेश वावरे,सामाजिक वनीकरण विभागाचे गणेश रणदिवे, संतोष सोनवणे, कळवण प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली गायकवाड, सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके, राजेश गवळी, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, प्रा.बाबा खरात, संजय ढोके, सतीश बोरसे,विलास पवार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रतनगड परिसरात उंबर,आंबा, वड, पिंपळ, चिंच, फणस, करंजी, कडुलिंब, बांबू, काजू, बाभूळ,पळस, जांभूळ या देशी व बहुउपयोगी आणि बहुगुणी झाडांची लागवड करण्यात आली.यावेळी अप्पर आयुक्त आंधळे म्हणाले की, देशी वृक्षांची लागवड ही केवळ निसर्ग प्रेम नव्हे तर भविष्यात शाश्वत सुरक्षित ठेवण्याचा मार्ग आहे.
पर्यावरण संवर्धनाबाबत जयहिंद लोकचळवळीने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठे काम उभे केले आहे. सह्याद्री ते सातपुडा असे दंडकारण्य अभियान राबवतांना वृक्ष संवर्धन संस्कृती वाढवली आहे.
प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्रदूषण कमी करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी तर शशिकांत देसले यांनी आभार मानले.
पर्यावरण संवर्धन प्रत्येकाचे आता मूलभूत कर्तव्य बनले आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून दंडकारण्य अभियान सुरू झाले. १९ वर्षापासून संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वृक्षारोपणातून हिरवाई निर्माण झाली असल्याचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यावेळी म्हणाले.

Visits: 133 Today: 2 Total: 1110155
