माजी मंत्री थोरात यांच्यामुळे मुळा नदीवर विविध बंधारे! नवीन लोकप्रतिनिधी अभ्यास करावा : ढेरंगे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पठार भागाला वरदान ठरणाऱ्या मुळा नदीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून ठिकठिकाणी केटीवर व बंधारे बांधण्यात आले आहेत. मोरवाडी धरणासाठी ही त्यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी अगोदर तालुक्यातील गावांचा अभ्यास करून बोलले पाहिजे असे मत संगमनेर तालुका असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष जयराम ढेरंगे यांनी व्यक्त केले.

याबाबत ढेरंगे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नवीन लोकप्रतिनिधींना अजून गावे माहिती नाहीत. काम माहिती नाही. फक्त हे करणार ते करणार या घोषणाबाजी सुरू आहेत. बाळासाहेब थोरात यांनी गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. पठार भाग अनेक वर्ष अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडलेला होता तरीही या भागात विकासाच्या योजना ह्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच राबवल्या. याचबरोबर मुळा नदीवर ठिकठिकाणी केटीवर व बंधारे बांधून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. मोरवाडी धरणासाठी ही त्यांनीच पाठपुरावा केला. २००४ ला माजी मंत्री बाळासाहेब थोरात कृषी मंत्री होते, त्यावेळेस सध्याचे जलसंपदा मंत्री ही मंत्री होते. समन्यायी पाणी वाटपाला विरोध हा पहिला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला तर संगमनेर मधून तीव्र मोठे आंदोलन करत निषेध नोंदवला यावेळी सध्याचे मंत्री गप्प बसून होते.

नवीन लोकप्रतिनिधींना काही लोक चुकीची माहिती देत असून त्यांनी अगोदर तालुक्याचा अभ्यास करावा, गावोगावी भेट द्यावी मगच जाहिरात बाजी करावी असा टोलाही त्यांनी लगावला.२००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्याला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वप्रथम विरोध केला. जायकवाडीला पाणी सोडू नये याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री स्व. मधुकर पिचड यांच्या नेतृत्वात संगमनेर मध्ये भव्य आंदोलन केले गेले. त्यावेळी सध्याचे जलसंपदा मंत्री गप्प होते, ते या आंदोलनात सहभागी झाली नव्हते आणि त्यांनी कोणतीही भूमिका मांडली नव्हती अशी टीका ॲड.अशोक हजारे यांनी केली.भोजापुर धरणातून संगमनेर तालुक्यातील गावांना पाणी मिळावे यासाठी कारखान्याच्या माध्यमातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दरवर्षी भोजापुर चारीची दुरुस्ती केली आहे. याचबरोबर शासनाच्या माध्यमातून या चारीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. निमोण व पाच गावांना ग्रॅव्हिटीद्वारे पाणी मिळावे याकरता पाणीपुरवठा योजना राबवली आहे.या कामांमुळे संगमनेर तालुका हा राज्यात प्रगतीचा ठरला आहे.
थोरात यांनी अविश्रांत काम करून गावागावात विकासाच्या योजना राबवल्या. आज संगमनेर तालुका सहकार, शिक्षण, समाजकारण, आर्थिक समृद्धी मध्ये राज्यात अग्रगण्य आहे. इतर तालुक्यांची तुलना केली तर संगमनेर हा समृद्ध तालुका दिसतो. हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळेच झाले आहे. जगात सर्वात सोपे नावे ठेवणे आणि सर्वात अवघड काम करणे असल्याचा टोला कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना लगावला.

Visits: 113 Today: 3 Total: 1110207
