करंजी गावात मराठा समाजाच्यावतीने पुढार्‍यांना प्रवेश बंदी! मराठा आरक्षण मागणीचा लढा दिवसेंदिवस होतोय तीव्र


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलनं सुरू आहेत. कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातही मराठा समाजाच्यावतीने राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी असल्याचे फलक लावण्यात आला असून हा फलक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष’ मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही, त्यामुळे आपली मानमर्यादा राखून गावात प्रवेश करावा, आजवर लढलो मातीसाठी एकदा लढा जातीसाठी या आशयाचा जरांगे पाटील मित्रमंडळ आणि सकल मराठा समाज समस्त करंजी गावच्यावतीने मारुती मंदिरासमोर भला मोठा फलक लावत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकार्‍यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना उपसरपंच शिवाजी जाधव म्हणाले, मला उपसरपंच पदापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे महत्त्वाचे असून पद गेले तरी चालेल परंतु मागे हटणार नाही. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात गेल्या महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरु होते. यावेळी उपोषणकर्त्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाला होता. परंतु, या घटनेचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटत असून मराठा समाजाचा आरक्षण मागणीचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाची वाढती मागणी लक्षात घेता संपूर्ण राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची मोठी अडचण झाली आहे. अनेक ठिकाणच्या राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस राज्य सरकारवर मराठा समाजाचा दबाव वाढत आहे. मनोज जरांगे हे देखील राज्यव्यापी दौरा करत असून आजपर्यंत त्यांनी त्यांचा मूळ गावी म्हणजेच आंतरवाली सराटी तसेच पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर आणि बारामती या तीन ठिकाणी मराठा समाजाच्या भव्य सभा घेत लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्यावतीने शासनाकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या करंजी गावात मनोज जरांगे पाटील मित्रमंडळ आणि सकल मराठा समाज युवकांच्यावतीने गावात भला मोठा फलक लावत तसेच सोशल मीडियाचा वापर करत सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांना आणि आजी-माजी नेत्यांना जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत आपल्याला आमच्या करंजी गावात प्रवेश नाही असा फलक लावल्याने संपूर्ण करंजी गावासह तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

Visits: 157 Today: 3 Total: 1105236

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *