पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा धरण ‘पुन्हा’ तुडूंब प्रवरा नदीही प्रवाही; निळवंडे ९० टक्क्यांवर पोहोचणार


नायक वृत्तसेवा, राजूर
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात रविवारी (ता.१७) पावसाने जोर धरल्याने तुंडूब असलेल्या भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढल्याने या धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता ३२५६ क्युसेकने तर सोमवारी सकाळी सहा वाजता २६४७ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पाणलोटात पाऊस पुन्हा सुरू झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

भंडारदर्‍यातून सोडण्यात येणारा विसर्ग तसेच कृष्णवंतीचे पाणी जमा होत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठा तासागणिक वाढू लागला आहे. पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास सोमवारी या धरणातील पाणीसाठा पुन्हा ९० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. सायंकाळी या धरणातील पाणीसाठा ७००१ दलघफू (८४.६७ टक्के) तर सोमवारी सकाळी सहा वाजता ७२०८ दलघफू (८६.५४ टक्के) झाला होता.

अख्ख्या जिल्ह्यात नगरकर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भंडारदरा पाणलोटातूनही मान्सूने पाय काढला होता. त्यामुळे सर्वचजण चिंतेत होते. पण भंडारदरा पाणलोटात गत तीन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. गुरुवार, शुक्रवारी अधूनमधून सरी कोसळत होत्या. परिणामी पाण्याची आवक होत होती. त्यानंतर रविवारी पहाटेपासूनच पाणलोटात पावसाने जोर धरला. त्यामुळे या भागातील धबधबे पुन्हा सक्रीय झाले. ओढेनाले भरभरून वाहू लागले आहे तर भातखाचरांतही पाणी साचले आहे. यामुळे शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण आहे. नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोटात रविवारी दिवसभर हलक्या सरी कोसळत होत्या. रविवारी सायंकाळी कोतूळ येथील मुळेचा विसर्ग ५०२ क्युसेक होता. तर धरणातील पाणीसाठा २०४९८ दलघफू (७९ टक्के) झाला होता. धरणातून १६२५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

गेल्या २४ तासांत झालेला पाऊस
भंडारदरा ४५ मिमी,
घाटघर ११९ मिमी,
पांजरे ६७ मिमी,
रतनवाडी १०५ मिमी,
वाकी २७ मिमी,
निळवंडे ३ मिमी,
अकोले ४ मिमी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *