बाळासाहेब विखेंनी महाराष्ट्रातचं नाही तर देशाच्या अनेक भागात काम केलं ः पंतप्रधान

बाळासाहेब विखेंनी महाराष्ट्रातचं नाही तर देशाच्या अनेक भागात काम केलं ः पंतप्रधान
स्व.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ पुस्तकाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन
नायक वृत्तसेवा, लोणी
माजी मंत्री, भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील पद्मभूषण स्व.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या पुस्तकाचं प्रकाशन आज (मंगळवार, 13 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करून दिली होती. ‘बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्रचं नाही तर देशाच्या अनेक भागात मंत्रिपदाच्या काळात काम केलं. ज्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाची चर्चाही होत नव्हती, अशा काळात त्यांनी शिक्षण संस्था सुरु केल्या. साखर उद्योगला चालना दिली, शेतकर्‍यांना प्रशिक्षित केले, शेतकर्‍यांची उत्पादकता, उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले. नव्या जुन्यांचा मेळ घालून शेती केली पाहिजे आणि इथेनॉलचा वापर जसाजसा वाढेल तसा तेलासाठी बाहेर जाणारा पैसा शेतकर्‍यांना मिळेल, हे त्यांनी दाखवून दिलं असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.


या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऑनलाईन उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री सुभाष भांबरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, हर्षवर्धन पाटील, हिवरेबाजारचे सरपंच पोपट पवार, आमदार सुरेश धस, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार, माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील, नगर येथे शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ.सुजय विखे, डॉ.प्रीतम मुंडे, धनश्री विखे उपस्थित होते. याप्रसंगी विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ असे नाव देण्यात आले.


पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात संबोधन करताना आवर्जुन फडणवीस सरकारचा उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘विखे पाटील यांनी पाणी प्रश्नावर काम केलं. 2014 पासून याच कामाला अधिक गती मिळाली. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची ओळखचं पाणी प्रश्नांसंदर्भातील आहे. तसेच गावं आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न विखे पाटील यांनी केला. आजही विखे पाटील यांच्या सर्व पिढ्या अधिक सक्षमतेने समाजसेवा करत आहेत.’ तसेच महाराष्ट्रातील कोरोना संकटावरही मोदी यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, कोरोनाचा धोका अजून बाकी आहे. महाराष्ट्रात हा धोका अधिक आहे. म्हणूनच नागरिकांनी हलगर्जीपणा करू नका. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. तोंडाला मास्क लावा, वारंवार हात स्वच्छ करा,’ असे आवाहन केले.


माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘अटल बिहारी सरकारच्या काळात काम करण्याची संधी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाली. त्यामुळेच उद्धव ठाकरे आजच्या ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित आहेत.’ तर उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, जुने ऋणानुबंध आहेत. मूर्ती छोटी पण कीर्ती महान, अजूनही समोर आहेत असंच जाणवतं. अडचणींचा सामना करत नाही तर जिद्दीने अडचणींवर मात करत पुढे येणार विखे पाटील यांचे घराणे आहे. व्यवस्थेचा दुष्काळ बाळासाहेब विखे पाटील यांनी दूर केला. एवढचं नाही तर अश्यक्य वाटणार्‍या गोष्टीही सत्यात आणल्या. इंदिरानिष्ठ घराणं होतं त्यांना कसे घ्यायचे? हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी केला नाही. काँगेसमध्ये कोंडल्या गेलेल्या हिर्‍याला बाळासाहेब ठाकरे यांनी कोंदण दिलं. मला या कार्यक्रमाला नसते बोलावले, तर मी नक्की रागावलो असतो. आपण पक्ष सोडून एकत्र काम करू. पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद आपल्यावर आहेतच,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमात बोलताना म्हणाले.


प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, बाळासाहेब विखे पाटील यांच्या हयातीत पुस्तक प्रकाशन होणं अपेक्षित होतं. पण दुर्देवाने तसं झालं नाही. एका सामान्य घरात जन्माला आलेला माणूस शेतकर्‍यांसाठी कार्य करतो, त्यांना दिशा देतो. बाळासाहेबांनी कांदा, दूध यांसारख्या प्रश्नांवर लक्ष दिले. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांचं आत्मचरित्र नवोदित तरुणांसाठी दिशादर्शक पुस्तक ठरेल.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे आत्मचरित्र नाही तर शेती, राजकारण, समाजकारण या सर्व विषयांवर भाष्य करणारा ग्रंथ आहे. आपल्या गरिबीचा विसर कधी त्यांनी पडू दिला नाही. जन्मभर भेदभाव न करता बाळासाहेब यांनी काम केलं आहे. तसेच दुष्काळ मुक्तीचा प्रयत्न सुरु केला होता. 1970 साली पाणी परिषदेसाठी सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी एकत्र केले. पश्चिम वाहिनीचे पाणी गोदावरी खोर्‍यात आणण्याची भावना सर्वात प्रथम बाळासाहेब विखे यांनी मांडली. त्यामुळे जेव्हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा दुष्काळ मुक्त होईल तेव्हा त्यांच स्वप्न पूर्ण होईल.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी सर्वच पक्षातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं होते. मात्र, भाजप, सेना व राष्ट्रवादीचे नेते मंचावर असताना काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी या कार्यक्रमापासून फारकत घेतली. त्यातही बाळासाहेब विखे पाटील यांच्या काँग्रेसमधील कारकीर्दीत त्यांचे सहकारी असणार्‍या नेत्यांनीही या कार्यक्रमाला पाठ दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Visits: 100 Today: 1 Total: 1099786

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *