सिमेंट बंधार्‍यांमुळे संगमनेर तालुक्यात पाण्याची समृद्धी ः थोरात अंभोरे व मालुंजे धरणांचे जलपूजन; शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सिमेंटचे जाळे निर्माण झाल्याने तालुक्यात पाण्याची समृद्धी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले.

यावर्षीच्या चांगल्या पाऊस पाण्यामुळे संगमनेर तालुक्यातील अंभोरे धरण पूर्ण भरले असून या धरण्याच्या ओव्हरफ्लो पाण्यातून कारखान्याच्या सहकार्याने भरविण्यात आलेल्या मालुंजे येथील धरणाचे जलपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, उपसभापती नवनाथ अरगडे, शॅम्प्रोचे उपाध्यक्ष अध्यक्ष सुभाष सांगळे, रावसाहेब खेमनर, लहानू खेमनर, ग्रामविकास अधिकारी जेजूरकर यांसह अंभोरे व मालुंजे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी-वस्तीवरील नद्या, ओढेनाले यांच्यावर बंधार्‍यांचे जाळे निर्माण केले आहे आणि यामुळे पाणी ठिकठिकाणी अडवले जात आहे. त्यामुळे तालुक्यात पाण्याची समृद्धी वाढली आहे. याचबरोबर तालुक्याला वरदान ठरणारे निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले असून कालव्यांची कामेही अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत निळवंडेचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात दिसेल तो तालुक्याचा सुवर्ण दिवस असेल असे संचालक इंद्रजीत थोरात म्हणाले. अंभोरे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने या धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी हे मालुंजे धरण्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्येही समाधान निर्माण झाले आहे. पाणी हीच खरी संपत्ती असून त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आनंद निर्माण होत असल्याचे राजहंसचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले.

Visits: 152 Today: 2 Total: 1426214

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *