माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांना मारहाण! मालमत्तेच्या वादातून चौघांनी रस्त्यातच गाठले; शहर पोलिसांत तक्रार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मालमत्तेच्या जून्या वादातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत यांना आज सकाळी दोघा महिलांसह चौघांनी मारहाण केली. या प्रकरणात करुणा मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार्या भारत भोसले यांच्यासह विद्या अभंग या महिलेचाही समावेश आहे. या घटनेत घुलेवाडी शिवारात राऊत यांची अलिशान कार अडवून दोघा महिलांनी त्यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली तर प्रथमेश अभंग व भोसले यांनी त्यांना प्रोत्साहन देत या संपूर्ण प्रकरणाचे मोबाईलवर चित्रीकरण करुन ते समाज माध्यमांमध्ये मोठ्या व्हायरल केले. याप्रकरणी राऊत यांनी शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला व राऊत यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा वाद असून त्यांच्यात यावरुन नेहमीच वादावादी होत असते. आज सकाळीही असाच प्रकार घडला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले सीताराम राऊत हे नेहमीप्रमाणे घुलेवाडीच्या अमृतेश्वर मंदिरात दर्शन घेवून आपल्या अलिशान वाहनातून जात असताना दोघा महिलांनी त्यांच्या वाहनाला आपले वाहन आडवे उभे केले. यावेळी विद्या अभंग व कविता अभंग यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी राऊत यांनी ‘तुम्ही नाहक मला शिव्या का देताहेत?, तुम्ही जे म्हणत आहात तसे नाही, खोटे आहे..’ वगैरे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र या महिला संतप्त झाल्याने त्यांनी राऊत यांना वाहनातून खाली उतरण्यास भाग पाडले. ते वाहनाच्या बाहेर येताच कविता संतोष अभंग यांनी त्याच्या शर्टची कॉलर पकडली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या विद्या संतोष अभंग यांनी त्यांना शिव्यांची लाखोळी वाहताना मारहाणही केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चेन ही त्यांनी ओढून घेतली. हा संपूर्ण प्रकार सुरु असताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यावर 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करणार्या व शहर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल करणार्या भारत संभाजी भोसले यांच्यासह विद्या अभंग यांचा मुलगा प्रथमेश याने आपल्या मोबाईलमध्ये संपूर्ण चित्रीकरण करुन ते भोसले यांनी समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल केले. हा प्रकार घडत असताना संगमनेर साखर कारखान्याच्या एका मोठ्या पदाधिकार्याने मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र या महिलांनी त्याला दाद दिली नाही.

या घटनेनंतर सीताराम राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत घडला प्रकार कथन केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग यांच्यासह भारत संभाजी भोसले या चौघांवर भारतीय दंडसंहितेचे कलम 327, 337, 341, 323, 500, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांनाही उधाण आले आहे.

