पुणे-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांत वृक्षारोपण ‘मनसे’ने गांधीगिरी करुन प्रशासनाचे वेधले लक्ष

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत संबंधित महामार्गाची निर्मिती करणार्‍या कंपनीच्या प्रशासनाला जाग यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता.18) सकाळी महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये गांधीगिरी करीत वृक्षारोपण केले आणि माती टाकून खड्डे बुजवले.

पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्‍या महामार्गावर अत्यंत वर्दळ असते. या महामार्गावरील बोटा ते रायतेवाडी फाटा दरम्यान ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये छोटी-मोठी वाहने आदळून अपघात होत आहेत. मात्र तरीही संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित कंपनीला दररोज लाखो रुपयांचा टोल भरुनही वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेत सोमवारी सकाळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके, खंडू जाधव, संकेत लोंढे, अविनाश भोर, दर्शन वाकचौरे, संदीप आव्हाड, रामा कुरकुटे, सुजीत कुरकुटे, वसीम पटेल, बाबाजी मुके, जालिंदर मरभळ, सचिन बोडके आदी मनसैनिकांनी एकत्र येत माहुली घाट, मल्हारवाडी, बोटा येथील खड्ड्यांमध्ये गांधीगिरी करीत वृक्षारोपण केले आणि माती टाकून खड्डे बुजवत प्रशासनाचे लक्ष वेधले.

यावेळी मनसैनिकांनी ‘राज साहेब तु आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणा दिल्याने महामार्ग दुमदुमून गेला होता. दरम्यान, या महामार्गावरून दररोज प्रवासी व मालवाहतूक वाहनांची ये-जा होत असते. मात्र खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होवू लागले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघात होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ हे खड्डे बुजवावे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांनी दिला आहे.

Visits: 153 Today: 2 Total: 1777701

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *