प्रवेश प्रक्रिया सुकर होण्यासाठी वंचितचे गटशिक्षणाधिकार्‍यांना निवेदन करोनामुळे गोरगरीब मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घेतला पुढाकार

नायक वृत्तसेवा, राहुरी
शैक्षणिक वर्षासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रिया सुकर व माफक होण्यासाठी तसेच गोरगरीबांच्या पाल्यांना मोफत प्रवेश मिळवून शिक्षणाची गंगा सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने व सामाजिक संघटनेच्यावतीने राहुरीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले, की राहुरी तालुक्यातील माध्यमिक, प्राथमिक, खासगी तसेच अनुदानित शाळांमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश दरम्यान अवास्तव फी मागणी करून सर्वसामान्य गोरगरीब मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याबाबत आपण तत्काळ सर्व शाळांना महाविद्यालयांना आदेश काढून सूचित करावे. तसेच सर्व शाळेच्या दर्शनी भागात त्याबाबत फलक लावण्यात यावा व प्रवेश प्रक्रिया सुकर व माफक व्हावी.

करोना महामारीने सर्वांचे जीवन विस्कळीत केले. त्यामुळे सर्वांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. अनेक गोरगरीब मुलांच्या शालेय प्रवेशाबाबत आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मुलांना प्रवेश देताना कोणत्याही शाळेने अवास्तव फी वसूल करू नये व सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. याबाबत शासनाच्या नियमानुसार संबंधित सर्व शाळा महाविद्यालयांना आपण तत्काळ सूचना कराव्यात व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी. येत्या दोन-तीन दिवसांतच सर्व शाळांना आपण याबाबत पत्रक काढावे व योग्य प्रशासकीय कारवाई करावी, असे न झाल्यास संबंधित माध्यमिक व प्राथमिक शाळेतच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आंदोलन केले जातील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते नीलेश जगधने यांनी दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे, तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, सचिन साळवे, तुषार दळवी, स्वप्नील गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 136 Today: 2 Total: 1590689

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *