‘तुम्हीच तुमचे आरोग्य सांभाळा व तुम्हीच तुमचे कुटुंब सांभाळा!’

‘तुम्हीच तुमचे आरोग्य सांभाळा व तुम्हीच तुमचे कुटुंब सांभाळा!’
माजी आमदार वैभव पिचड यांचा राज्य सरकारवर घणाघाती टीका
नायक वृत्तसेवा, अकोले
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठामपणे कोरोना ही आमची जबाबदारी राहिली नसल्याचे सांगितले आहे. तुम्हीच तुमचे आरोग्य सांभाळा व तुम्हीच तुमचे कुटुंब सांभाळा, अशी कदाचित सरकारी भूमिका असावी,’ अशी टीका माजी आमदार वैभव पिचड यांनी राज्य सरकारवर केली आहे. ‘सरकारच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागातील जो नागरिक आहे, त्यांचे आर्थिक आरोग्य धोक्यात येणार असून राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसतेय,’ असेही त्यांनी स्पष्ट केले असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.


राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेवर भाष्य करताना राज्य सरकारवर माजी आमदार वैभव पिचड यांनी जोरदार निशाणा साधला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. मात्र, ही मोहीम चालविताना कोरोना ही आमची जबाबदारी राहिलीच नाही, असेच राज्य सरकारला कदाचित सांगायचे आहे, असे सांगतानाच ते पुढे म्हणाले, ‘कोरोना जेव्हा सुरू झाला, तेव्हा सर्वात प्रथम त्याची जबाबदारी ग्रामीण भागात गावातील सरपंच म्हणजेच कोरोना समितीवर टाकण्यात आली. या समितीसाठी मात्र राज्य सरकारने एकही रुपयांची तरतूद केली नाही. जो काही खर्च झाला, तो ग्रामपंचायतींना स्वतःच्या उत्पनातून करावा लागला. तसेच आता जी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू झाली, त्यात सुद्धा सरकारने सांगितले आहे की ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी दोन कर्मचारी नियुक्त करून त्यांचा हजार-हजार रुपये पगार हा ग्रामपंचायतीने द्यावा. पण या सर्वेक्षण कामासाठी ग्रामपंचायतीने उत्पन्न आणायचे कुठून? गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांमध्ये आर्थिक चणचण सुरू आहे. ग्रामपंचायत कर्मचारी-पदाधिकारी वसुलीला गेले, तर त्यांचे लोकांसोबत भांडण होत आहे. कोरोना सुरू झाल्यापासून ग्रामपंचायतींना उत्पन्न नाही. अशा परिस्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी ग्रामपंचायतींना पैसे टाकायला सांगणं योग्य नसल्याचे पिचड म्हणाले. ‘ही मोहीम म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठामपणे सांगितले आहे की, कोरोना ही आमची जबाबदारी राहिलीच नाही. तुम्हीच तुमचे आरोग्य सांभाळा व तुम्हीच तुमचे कुटुंब सांभाळा, या पद्धतीची सरकारची भूमिका दिसतेय, असा गंभीर आरोप पिचड यांनी केला आहे.


अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले हा एकमेव तालुका आदिवासी तालुका आहे. या भागाकडे पाहिले तर एकीकडे सर्पदंशाचे रुग्ण आहेत, तर दुसरीकडे कोरोना रुग्ण आहेत. पण आरोग्याच्या बाबतीत प्रशासन, पालकमंत्री यांनी तालुक्याकडे दुर्लक्ष केले आहे. तसे तर जिल्हा राज्याच्या मध्यभागी आहे. या जिल्ह्यात एकमेव आदिवासी तालुका आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर राज्यातील कानाकोपर्‍यात असणार्‍या भागांत विशेषत: गडचिरोली सारख्या जिल्ह्यात काय अवस्था होत असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 28834

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *