अहमदनगर जिल्ह्याची चिंता वाढली; बाराजण विदेशातून आले जिल्हा प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू; अकोल्यातील चौघांचा समावेश

नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर जिल्ह्यात यापूर्वी विदेश प्रवास करून आलेल्या पंधरा जणांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असली तरी आता आणखी 12 जण विदेश प्रवास करून आल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य म्हणजे नव्याने आलेले हे प्रवासी जोखमीच्या दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅण्डमधून आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

नव्याने आलेल्या प्रवाशांमध्ये अहमदनगर शहरातील पाच, अकोले तालुक्यातील चार, कोपरगावमधील दोन आणि राहाता तालुक्यातील एक प्रवाशाचा समावेश आहे. 28 नोव्हेंबरनंतर ते जोखमीच्या भागातून प्रवास करून आलेले असल्याने त्यांची माहिती सरकारकडून जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आलेली आहे. सुदैवाने आतापर्यंत जिल्ह्यात आलेल्या एकाही प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही.

दक्षिण आफ्रिकेसह नेदरलॅण्डमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. सोबतच इतरही देशांत याचा फैलाव झाला आहे. त्यामुळे परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 28 नोव्हेंबरनंतर 12 प्रवासी या अतिजोखमीच्या देशातून प्रवास करून आल्याची माहिती प्राप्त होताच प्रशासन सतर्क झाले आहे. महापालिका आरोग्य विभाग, ग्रामीण आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनामार्फत त्यांच्याशी संपर्क केला जात आहे. त्यांची तपासणी करून घेणे, त्यांना विलगीकरणात ठेवणे ही कामे केली जाणार आहेत. या प्रवाशांची पहिली चाचणी केली जाईल. ती निगेटिव्ह आली तरीही त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल. त्यानंतर पुन्हा चाचणी केली जाईल. त्या चाचणीच्या अहवालावर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी कार्यपद्धती ठरवून देण्यात आलेली आहे. यापूर्वीही अहमदनगर जिल्ह्यात 15 प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले होते. त्यांचीही अशा पद्धतीने चाचणी करण्यात येऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सुदैवाने अहमदनगर जिल्ह्यात अद्याप एकाही आंतरराष्ट्रीय प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही.

Visits: 164 Today: 1 Total: 1776857

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *