टाळे ठोकण्याच्या इशार्यानंतर विमानतळ प्रशासनाचे लेखी आश्वासन शिर्डी विमानतळाकडे काकडी ग्रामपंचायतची चार कोटींची थकबाकी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी विमानतळाकडे काकडी ग्रामपंचायतीच्या करांची 4 कोटी 2 लाख रुपयांची थकबाकी आहे. 2016-17 पासून विमानतळाने करच भरलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने विमानतळ प्रशासनाला नोटीस दिली होती. शेवटी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी पंधरा दिवसांत थकबाकी भरली नाही, तर विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यावर आता प्रशासन हलले असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी लेखी आश्वासन दिले आहे.

शिर्डीचा हा विमानतळ कोपरगाव तालुक्यातील काकडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. नियमानुसार विमानतळाला ग्रामपंचायतीचे कर भरणे आवश्यक आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीने 2016-17 पासून बिले दिली आहेत. मात्र, विमानतळाकडून पैसे भरण्यात आले नाही. त्याची थकबाकी आता 4 कोटी 2 लाख 48 हजार रूपये झाली आहे. त्यामुळे काकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पूर्वा रवींद्र गुंजाळ व ग्रामपंचायत सदस्यांचे शिष्टमंडळाने शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाकडे अनेकदा पाठपुरावा केला. विमानतळ कंपनीसह सरकारकडेही पाठपुरावा सुरू होता. तरीही ही रक्कम न मिळाल्याने ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते पाणी आरोग्य वीज, शाळा अन्य विविध विकासाच्या योजना राबविताना अडचणी येत आहेत.

औरंगाबाद येथील विधीज्ञ राहुल टेमक यांच्यामार्फत 11 ऑक्टोबर रोजी विमानतळ प्रशासनाला नोटीस बजावली होती. शेवटी नाईलाज म्हणून कोल्हे यांनी प्रसारमाध्यमापुढे भूमिका मांडताना काकडी शिर्डी विमानतळ व्यवस्थापनास पंधरा दिवसांची मुदत देत रक्कम न मिळाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी काकडी ग्रामपंचायत थकीत कर रक्कम मागणीचा प्रस्ताव तयार केला. तो सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यासोबतच ग्रामपंचायतीला पत्र देऊन थकबाकी वसुलीसंबंधी तूर्त कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंती केली आहे. यासंबंधी कोल्हे म्हणाले, आता विमानतळ कंपनीने काकडी ग्रामपंचायतीचे 2022 पर्यंतची थकीत कर रक्कम 5 कोटी 9 लाख 38 हजार 916 रुपये तातडीने भरावी. त्याचा उपयोग काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विकासकामांना होणार आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळाली नाही तर पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील, असा इशाराही कोल्हे यांनी दिला आहे.
