दुग्ध व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी सकस चारा गरजेचा ः देशमुख फॉरेज स्पेशालिस्ट अँडव्हान्टा कंपनीच्यावतीने चारा पीक पाहणी कार्यक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील शेतकर्यांनी दूध उत्पादनात क्रांती केली आहे. सर्वाधिक दुधाचा पुरवठा करण्यामध्ये आज संगमनेर तालुका अग्रेसर आहे. शेतकर्यांनी दुग्ध व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी जनावरांना लसीकरण, जंतनिर्मूलन व गोठ्यातील स्वच्छतेबरोबर सकस चारा देणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त दूध देणार्या गायी निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उच्च प्रतीच्या वीर्यमात्रा स्वस्त दरात म्हणजे फक्त 81 रुपयांत शेतकर्यांना दिल्या जाणार आहेत. यातून दुग्ध व्यवसायात शेतकर्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल असा विश्वास महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.

फॉरेज स्पेशालिस्ट अँडव्हान्टा कंपनीच्यावतीने आयोजित चारा पीक पाहणी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, सीताराम राऊत, पांडुरंग पाटील, अॅड. बाबासाहेब गायकर, भास्कर सिनारे, सोमनाथ जोंधळे, अनिल बोटे, डॉ. जालिंदर तिटमे, डॉ. प्रशांत पोखरकर, डॉ. सुजित खिलारी, डॉ. संतोष वाकचौरे, विलास उंबरकर, किसन शिंदे, डॉ. बाळासाहेब वाकचौरे, डॉ. कृष्णा घोगरे, डॉ. आशुतोष रहाणे, डॉ. प्रमोद पावसे, आशिष देवतळे, योगेश हासे, शुभम सरनाईक, बबन राऊत, अँडव्हान्टा कंपनीचे कर्मचारी, शेतकरी व इतर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

दुधाच्या दरात होत असलेले चढ-उतार स्थिर करण्यासाठी एफ. आर. पी. बद्दल दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. कमी खर्चात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी 1500 रुपये किंमतीच्या उच्च प्रतीच्या विदेशी वीर्यमात्रा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकर्यांना कमीत कमी किंमतीत उपलब्ध केल्या जाणार आहेत. यातून भविष्यात जास्त दूध देणार्या गायी तयार होवून शेतकर्यांच्या कुटुंबात आर्थिक सुबकता येईल. राजहंस दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकर्यांना चारा पिकासाठी 110 मेट्रिक टन मका बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. तर दुग्ध व्यवसायातील कष्ट कमी करण्यासाठी मुरघास जनजागृती कार्यक्रम राबवून जनजागृती केली गेली आहे. याचा परिणाम दुष्काळी भागात उन्हाळ्यात जनावरांचा चार्याचा प्रश्न सुटून अधिक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित झाले असल्याने महानंद आणि राजहंसचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी नमूद केले. याचबरोबर जनावरांना सकस व पोषक चारा गरजेचा असल्याचे सांगून अँडव्हान्टा कंपनीने 14 प्रकारचे चारा बियाणे विदेशी तंत्रज्ञान वापरून तयार केले आहेत. ते त्यांनी शेतकर्यांपर्यंत लवकर पोहोच केले तर दुग्ध व्यवसायातून शेतकरी कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक अँडव्हान्टा कंपनीचे व्यवस्थापक पांडुरंग पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन नीलेश पर्बत यांनी केले.

