गाव बंदसाठी वांबोरीतील युवक आक्रमक

गाव बंदसाठी वांबोरीतील युवक आक्रमक
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वांबोरी गावात कोरोना विषाणूंचा फैलाव झपाट्याने होत असून एकूण रुग्णसंख्या 44 झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून गर्दीचे नियमन होत असल्याने सुमारे शंभर युवकांनी ग्रामपंचायतीत धाव घेऊन संताप व्यक्त करत जनता संचारबंदीची मागणी केली आहे. परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने पुढील निर्णयासाठी तहसीलदारांना सोमवारी (ता.7)पत्र दिले.


कोरोना रोखण्यासाठी यापूर्वी वांबोरी ग्रामपंचायतीने आठवड्यात एक दिवस दर सोमवारी जनता संचारबंदीची घोषणा केली होती. परंतु, दोन महिन्यानंतर पुन्हा दुकानांसह बाजारपेठ खुली झाली. बहुतेकजण मास्कचा व सुरक्षित अंतराचा नियम पाळत नसल्याने बाधीत रुग्णांची संख्या 44 वर पोहोचली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 28 जण बरे झाले असून 13 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा धोका वाढत असल्याने गावातील युवकांनी गाव बंदच्या मागणीसाठी सोमवारी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामविकास अधिकार्‍यांसह प्रशासनाला धारेवर धरले. मंडल अधिकारी दत्ता गोसावी, तलाठी सतीश पाडळकर, ग्रामविकास अधिकारी बी.के.गागरे, भाऊसाहेब ढोकणे, भानुदास कुसमुडे, कृष्णा पटारे, विशाल पारख, रवी पटारे, महेश काळे, उदय मुथ्था, श्रीकांत शर्मा, संकेत पाटील आदी उपस्थित होते. युवा ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेतून गावाचे निर्जंतुकीकरण करण्यास प्रशासनाने सहमती दर्शविली. परंतु, दहा दिवस गाव बंद ठेवण्यासाठी तहसीलदारांना पुढील निर्णयासाठी पत्र पाठविण्याचे ठरले आहे. नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवले आहे. जर अंमलबजावणी केली नाही तर युवक स्वतः बंद करण्यासाठी पुढे येतील असा इशाराही देण्यात आला आहे.

Visits: 129 Today: 1 Total: 1422251

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *