मुळा धरणाच्या अकरा मोर्यांतून जायकवाडीकडे पाणी झेपावले
मुळा धरणाच्या अकरा मोर्यांतून जायकवाडीकडे पाणी झेपावले
2000 क्युसेकने विसर्ग; नदीकाठच्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण
नायक वृत्तसेवा, राहुरी
दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून मंगळवारी (ता.1) सकाळी दहा वाजता 11 मोर्यांद्वारे 2000 क्युसेकने जायकवाडीकडे पाणी झेपावले. मुळा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी कळ दाबल्यानंतर पाणी सोडण्यात आले.

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या अकरा मोर्यांद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला. धरणाकडे 3000 पाण्याची क्युसेकने आवक सुरू आहे. मुळा धरणावर असलेला भोंगा वाजवल्यानंतर पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी विसर्ग सुरू झाल्यानंतर अनेक शेतकर्यांनी विद्युत मोटारी यापूर्वीच काढून ठेवल्या आहेत. धरणातून पाणी सोडल्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात आज अखेर 25 हजार 500 इतका पाणीसाठा असून 3 हजार क्युसेकने आवक सुरू असून नदीपात्रात दोन हजार क्युसेकने, डाव्या कालव्याद्वारे मुसळवाडी तलावात 150 क्युसेकने तर ऊर्जा निमिर्तीसाठी उजव्या कालव्याद्वारे 500 क्युसेकने पाणी सोडल्यात आल्याचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.

