केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला ः आ.डॉ.तांबे इंधन दरवाढीच्या विरोधात संगमनेरात युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वसामान्य जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची भरमसाठ दरवाढ केली आहे. याचा तीव्र निषेध देशातील जनता करत असून हे सरकार विश्वासघाताने सत्तेवर आले आहे, अशी टीका नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केली असून युवक काँग्रेसच्यावतीने मोदी सरकारच्या विरोधात हाय-हायच्या घोषणा देत भाववाढीचा तीव्र निषेध करण्यात आला.

संगमनेरातील दिल्ली नाका येथे युवक काँग्रेस, एनएसयूआयच्यावतीने केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसवाढीच्या निषेधार्थ विश्वासघात आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, युवक शहराध्यक्ष निखील पापडेजा, सुभाष सांगळे, गौरव डोंगरे, आनंद वर्पे, शेखर सोसे, ऋतिक राऊत, मनीष राक्षे, प्रा.बाबा खरात, गोपी जहागिरदार, लाला खान, अक्षय दिघे, रमेश दिघे, नितीन अभंग, विजय उदावंत, शैलेश कलंत्री, नितीन सांगळे, बाळासाहेब कानवडे, सुमित वाघमारे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व भाववाढी विरोधात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर विश्वासघात आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत संगमनेरमध्ये तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने आंदोलन झाले. यावेळी मोदी सरकारच्या धोरणाविरोधात व केंद्र सरकार विरोधात युवक काँग्रेसने जोरदार घोषणा दिल्या.

याप्रसंगी बोलताना आमदार डॉ.तांबे म्हणाले, भाजप सरकारने भारतातील जनतेचा पूर्णपणे विश्वासघात केला आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारने फक्त जनतेला फसवले आहे. अफवा पसरवणे व खोटे बोलणे ही भाजप सरकारची सर्वात मोठी ताकद आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत होते त्यावेळेस भाजपच्या लोकांनी हे सरकार खूप भाववाढ करत आहे म्हणून आंदोलने केली. मात्र त्याकाळात अजिबात भाव वाढ होत नव्हती. मागील सहा वर्षांत भरमसाठ भाव वाढ झाली आहे. पेट्रोलचे भाव शंभरी पार झाली आहे. लोकांना फसवून, भूलथापा देऊन काँग्रेसवर केलेल्या घोटाळ्यांचे आरोप हे सरकार सहा वर्षांत एकदाही सिद्ध करू शकले नाही. याचा अर्थ काँग्रेसने काही घोटाळा केलाच नव्हता. मात्र भाजपने बनवाबनवी केली, आता जनतेवर भाववाढीचा बोजा लादला आहे. अच्छे दिन सोडा संपूर्ण गोरगरिबांसाठी बुरे दिन सुरू झाले आहेत, अशी टीका आमदार डॉ.तांबे यांनी दिली आहे. याप्रसंगी सनी ठोंबरे, ऋतिक पावसे, दत्ता वाघचौरे, जयेश जोशी, सचिन खेमनर, सागर कानकाटे, श्रेयस कर्पे, मुश्ताक शेख, किशोर जोशी आदी विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
