देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या ः थोरात दहा कोटींच्या रस्त्यांच्या कामाचा थाटात शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण पूर्ण केले. यामध्ये ज्यांचे योगदान नाही, ते आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसह अनेक विकासकामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळवला होता. मात्र विद्यमान सरकारने या विकासकामांना स्थगिती दिली असून होती. ही विकासकामांची स्थगिती उच्च न्यायालयातून उठवली असून आगामी काळात लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील कुरण येथे संगमनेर-कुरण-पारेगाव खुर्द, नान्नज दुमाला या रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी निसार बशीर शेख, उबेद शेख, लक्ष्मण कुटे, बी. आर. चकोर, निसार गुलाब शेख, के. के. थोरात, इफ्तीशाम रियाज शेख, योगिता सातपुते, नदीम शेख, भास्कर शेरमाळे, शबीर शेख, इजाज लाला शेख, शेख मुश्ताक ईस्माइल, जावेद महम्मद हुसेन, प्रभाकर सोनवणे, शहानवाज महमद हमीद, अजीज मोहीद्दन, मुदस्सर मन्सूर सय्यद, तार महम्मद अबास, खलील अबास, रियाज लतीफ आदिंसह कुरण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले, सध्या जाती व धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. महाराष्ट्रात झालेला सत्ता बदल हा सामान्य माणसाला आवडलेला नाही. संपूर्ण राज्यातील जनता ही महाविकास आघाडीच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालव्यांना मोठा निधी मिळून कालव्याची कामे पूर्ण केली. उद्घाटनाच्या वेळी ज्यांचे योगदान आहे अशांपैकी कोणीही नव्हते. श्रेय घेण्यासाठी ही मंडळी धडपड करत आहे. मात्र जनतेला खरे माहीत आहे. याच काळात तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी साधारण ७५० कोटींचा निधी मिळवला. तर रस्त्यांच्या कामांसाठीही मोठा मोठा निधी मिळवला. मात्र विरोधी पक्षातील आमदारांच्या विकासकामांना या विद्यमान सरकारने स्थगिती दिली. आता ही स्थगिती उच्च न्यायालयातून उठवली असून कामे पूर्वत सुरू केली आहे. कठीण काळ असला तरी तो जास्त नाही. आगामी काळात सरकार हे महाविकास आघाडीचेच आहे. मात्र जातीयतेतू होत असलेले ध्रुवीकरण हे संविधानाने लोकशाहीसाठी घातक असून सर्वांनी मतभेद विसरून तालुका, राज्य व देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या, असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. प्रास्ताविक शेख यांनी केले तर निसार शेख यांनी आभार मानले.

जंगी मिरवणूक…
आमदार बाळासाहेब थोरात यांचे कुरण गावामध्ये आगमन होतात फटाक्यांची आतिषबाजी व तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर जंगी मिरवणूक काढण्यात आली. याचबरोबर निळवंडेचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिल्याबद्दल आमदार थोरात यांचा सर्व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
