दडपशाहीच्या निषेधार्थ 6 फेब्रुवारीला शेतकर्‍यांचा देशभर चक्का जाम! संयुक्त किसान मोर्चा समविचारी संघटनांना सोबत घेऊन करणार आंदोलन

नायक वृत्तसेवा, अकोले
दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने 6 फेब्रुवारीला देशभर शेतकर्‍यांचा रास्ता रोको करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्रातही हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी किसान सभेच्या शाखा सक्रिय झाल्या असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी दिल्लीतील चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. भाजपचे कार्यकर्ते स्थानिक व्यापारी असल्याचे भासवत आंदोलकांवर पोलिसांच्या मदतीने दगडफेक करत आहेत. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. शेकडो शेतकर्‍यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर केसेस दाखल केल्या जात आहेत. काही पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत.

आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकर्‍यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठाही खंडित केला जात आहे. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे. संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे. सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व तीन कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने 6 फेब्रुवारी, 2021 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळात देशभर रास्ता रोको करण्याचे आवाहन केले आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी किसान सभेच्या सर्व शाखा सक्रियपणे नियोजन करत आहेत. समविचारी संघटनांना सोबत घेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी व श्रमिकांनी या आंदोलनात सक्रिय भागीदारी करावी असे आवाहन शेतकरी नेते डॉ.अशोक ढवळे, जे.पी.गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ.अजित नवले यांनी केले आहे.

Visits: 94 Today: 1 Total: 1109925

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *