बोटा शिवारात संत्रे घेऊन जाणारा ट्रक पलटी
नायक वृत्तसेवा, घारगाव
नाशिक येथून पुण्याच्या दिशेने सोळा टन संत्रे घेऊन निघालेला मालवाहू ट्रक संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा शिवारातील आळेखिंडीजवळील हनुमान नगर येथे ब्रेक निकामी झाल्याने पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला पलटी झाल्याची घटना मंगळवारी (ता.2) सकाळी अकरा-साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे.
नाशिक येथून मालवाहू ट्रक (क्रमांक आरजे.27, जीसी.1664) हा मंगळवारी सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमारास सोळा टन वजनाचे संत्रे घेवून पुणे येथे चालला होता. दरम्यान, ब्रेक निकामी झाल्याने बोटा शिवारातील आळेखिंडीजवळील हनुमान नगर येथे आला असता पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला पलटी झाला. या अपघाताची माहिती पोलीस पाटील संजय जठार यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस हवालदार कैलास देशमुख, गणेश लोंढे, डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, योगिराज सोनवणे, एकनाथ लिंबोरे, मनेष शिंदे, अरविंद गिरी आदिंनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. या अपघातात संत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे.