मागील सरकारच्या काळात मला खूप त्रास झाला! ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांचा वंजारवाडी येथील कार्यक्रमात गौप्यस्फोट

नायक वृत्तसेवा, नेवासा
‘सरकारी नोकरीत असताना मला चांगल्या कामाबद्दल पद्मश्री पुरकास्कार मिळाला. तरीही मागील सरकारच्या काळात खूप त्रास झाला. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या धनंजय मुंडे यांचा मोठा आधार मिळाला, त्यांच्यामुळेच मी सरकारी नोकरीत राहू शकलो,’ असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने केला. ‘माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य आपण मुंडे यांना देऊ इच्छितो,’ असेही लहाने म्हणाले.

नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ-संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ.लहाने यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ.लहाने बोलत होते.

मागील सरकारच्या काळात अधिष्ठाता असताना डॉ.लहाने यांना अनेक अडचणी आणि सरकारच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल झाला होता. यावेळी झालेल्या त्रासाची आठवण त्यांनी भाषणातून सांगितली. तत्कालीन फडणवीस सरकारवर टीका करताना त्यांनी मुंडे यांचे मात्र कौतुक केले. डॉ.लहाने म्हणाले, ‘गेल्या सरकारच्या काळात मला काही अडचणी आल्या. त्यावेळी मला मोठा त्रास सहन करावा लागला. मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मुंडे यांनी मोलाची मदत केली. सभागृहासह सर्व पातळ्यांवर माझी बाजू लावून धरली. त्यांच्यामुळेच मी सरकारी नोकरीत राहू शकलो. निरपेक्ष प्रेम कसे करावे, आपल्या माणसांना कसे जपावे हे त्यांच्याकडून शकले पाहिजे. ते आता मंत्री झालेत. मी सरकारी नोकर आहे, तरीही ते माझा आशीर्वाद खाली वाकून घेतात, हे त्यांचे मोठेपण आहे. आम्ही दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळावे, अशी आपण प्रार्थना करतो.’

यावेळी बोलताना मंत्री मुंडे म्हणाले, ‘डॉ.लहाने यांच्यासारख्या जगविख्यात नेत्रतज्ज्ञाला माझ्या हस्ते पुरस्कार दिला जातो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. डॉ.लहाने आमचे नातेवाईक आणि परळीचे जावई असल्याने आमच्यासाठी ते नेहमीच आदरस्थानी आहेत. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जातीवाचक नावे असलेल्या वाड्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वंजारवाडीच्या लोकांनी एका थोर महापुरुषाचे नाव घेऊन तसा ठराव करावा,’ अशी सूचनाही मुंडे यांनी शेवटी केली.

Visits: 176 Today: 1 Total: 1854516

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *