तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी प्रवरेत प्रोफाईल वॉल बांधण्याकडे लक्ष द्यावे! माजी आमदार वैभव पिचडांचा आमदार डॉ.किरण लहामटेंना उपरोधिक सल्ला

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात वळण बंधारे होतीलच; मात्र प्रवरेतील प्रोफाईल वॉल बांधून अकोले तालुक्यात पाण्याची उपलब्धता करून देणे आवश्यक असताना तालुक्याचे लोकप्रतिनिधी जे काम होणार आहे त्याबाबत बोलतात. त्यापेक्षा प्रोफाईल वॉल बांधून आणि सरकार दरबारी आपले वजन वापरून तालुक्याला जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देणार आहेत का नाही? असा थेट सवाल माजी आमदार वैभव पिचड यांनी आमदार डॉ.किरण लहामटे यांचे नाव न घेता विचारला आहे.

माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे, माजी मंत्री मधुकर पिचड यांनी कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ते प्रवरेत वळवून त्याचा फायदा जिल्ह्यासह दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्याला मिळावा म्हणून वळण बंधारे निर्मितीचा निर्णय घेतला. तत्कालीन सरकारने त्याला मंजुरी दिली. यापुढेही तो विषय सरकारी पातळीवर होणार आहेच. मात्र प्रोफाईल वॉलसाठी 12 जागा निश्चित करण्यात आल्या असून माजी मंत्री पिचड यांनी त्यास मंजुरी देखील घेतली आहे. शिवाय केंद्रीय जल आयोगाने देखील त्यास मान्यता दिली आहे. मग हा प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक असताना तालुक्याच्या आमदारांनी जलसंपदा विभाग व सरकार दरबारी आपले वजन वापरून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सरकारकडे आग्रही भूमिका घेऊन सोडविणे आवश्यक असताना चुप्पी का घेतली आहे.

कालव्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी म्हाळादेवी व पिंपरकणे पुलाचे कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. युती सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेतल्यामुळे पुलाचे काम झाले. मात्र गेल्या वर्षभरापासून हे काम बंद आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता असून तो निधी आणून काम सुरू होणे आवश्यक आहे, असे सूचवून तालुक्यात पाणी अडविण्यासाठी जागा उपलब्ध आहेत. त्याचे प्रस्ताव सरकार दरबारी पाठवून मंजुरी आणणे गरजेचे आहे. परंतु, त्याबाबत उदासीनता असून किमान एखादा बंधारा तरी मंजूर करा असा खोचक टोमणा पिचड यांनी शेवटी आमदार लहामटे यांना लगावला.


भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधण्यासाठीच्या कामाचा सर्व्हे करून अंदाजपत्रक तयार करण्याचा आदेश तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना दिला. मुंबई येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आपण उपस्थित केलेल्या या मुद्यावर सकारात्मक विचार करत मंत्री महाजन यांनी या सूचना अधिकार्‍यांना केल्या. भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर धरणातील पाणी पातळी जसजशी कमी होत जाते, तसतसे पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पायथ्याशी धरण असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः नागरिकांच्या घशाला कोरड पडते. म्हणून हे टाळण्यासाठी भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधल्यास पाणलोट क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असेही माजी आमदार वैभव पिचड यांनी सूचविले आहे.

Visits: 102 Today: 1 Total: 1113713

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *