टाकळीमियाँ येथे लग्नात तब्बल शंभरावर वर्हाडींना विषबाधा! रबडी खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज; विविध रुग्णालयांत उपचार सुरू
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील टाकळीमियाँ येथे एका लग्नात तब्बल शंभरावर वर्हाडींना विषबाधा झाली. रबडी खाल्ल्यामुळे हा प्रकार घडला आहे. सर्वांना तात्काळ राहुरी, राहुरी फॅक्टरी, कोल्हार येथे उपचारांकरिता दाखले केले. त्यातील चार अत्यवस्थ रुग्णांना लोणी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, टाकळीमियाँ येथे रविवारी (ता.3) दुपारी दत्तात्रय काळे (रा. टाकळीमियाँ) यांची मुलगी व स्व.राजेंद्र कडसकर (रा.कोल्हार बु.) यांचा मुलगा यांच्या विवाहाला उपस्थित वर्हाडींना ही विषबाधा झाली. दुपारी तीन ते चारच्या दरम्यान वर्हाडींना त्रास जाणवू लागला. 108 रुग्णवाहिकेचे डॉ.रमेश रणसिंग, चालक लक्ष्मण काळे यांनी तातडीने धाव घेतली. त्यांना राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
टाकळीमियाँ ग्रामस्थांनी दुचाकी, चारचाकी वाहनांमधून राहुरीतील विविध ठिकाणी खासगी रुग्णालयात रुग्णांना दाखल केले. कैलास चोथे (वय 52), मोहन मोरे (आचारी), जावेद बेग, इम्रान पठाण (15) यांना लोणी येथील रुग्णालयात हलविले. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विविध रुग्णालयांमध्ये भेटी देऊन रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली.
यामध्ये इतर रुग्ण अण्णासाहेब मोरे, सलीमा पठाण, सोनाली अँथनी, जिजाराम चिंधे, भागवत करपे, जयेश ठोसर, आर्यन ठोसर, असीफ शेख, सुरेश कवाणे, केरू वराळे, साहिल शेख, बालम शेख, सानिया बोर्डे, नंदकिशोर खंडागळे, नंदिनी खंडागळे, शफीक पठाण, अलीम शेख, अलफिया पठाण, तमन्ना पठाण, अमीन शेख, अन्वर बेग, संतोष भांड, ओम भांड, शिवाजी निमसे, असीफ पठाण, मेहक पठाण, रमजान पठाण, रसूल पठाण, जोया शेख, बाबासाहेब करपे, लता धोंगडे, सलीम पठाण, पार्वती करपे, ध्रुव अँथनी, रामभाऊ तारडे, बापूसाहेब जाधव, सूर्यभान जुंदरे, अश्विनी शिंदे, देविदास कल्हापुरे, सचिन शिंदे, सुरेश निमसे, आर्शद शेख, भूषण आठरे.
विवाह समारंभातील अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. रुग्णांना कोणतीही वैद्यकीय गजर लागली तर मी तात्काळ हजर राहील. डॉक्टरांना रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अत्यवस्थ रुग्णांना तातडीने अद्यावत सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करावे.
– प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री
टाकळीमियाँ येथील विवाह सोहळ्यातील अन्नातून 80 ते 90 जणांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. टाकळीमियाँ व कोल्हार येथील दोन्ही कुटुंबियांना व त्यांच्या नातेवाईकांना विषबाधा झाली असून, राहुरी, कोल्हार, लोणी येथील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तेथे मी स्वत: भेट देऊन अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.
– डॉ.संदीप सांगळे (जिल्हा आरोग्य अधिकारी)