लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणार्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणार्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
नेवासा तालुक्यातील घटनेवरुन लग्न करून फसवणूक करणार्या टोळीचे रॅकेट उघडकीस
नायक वृत्तसेवा, नेवासा
लग्न करण्यासाठी मुलाकडून लाखो रुपये उकळायचे, नंतर प्रत्यक्षात त्याच्यासोबत लग्नही करायचे आणि दोन ते तीन दिवसांतच तिथून पळ काढायचा… ऐकून धक्का बसेल पण अहमदनगर जिल्ह्यात अशी लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणार्या टोळीचा अहमदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
![]()
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी शारदा भागाजी तनपुरे (रा.टिटवी, ता.लोणार, जि.बुलडाणा), सागरबाई किसन डवरे (रा.लोणार, जि.बुलडाणा), मायावती नारायण चपाते (रा.जमुनानगर, जि.जालना), अनिल नाथा झिने (रा.जमुनानगर, जि.जालना) व रुपाली पांडुरंग जगताप यांना ताब्यात घेतले आहे. अलिकडच्या काळात लग्नासाठी पैसे घेऊन लग्न करून पतीच्या घरून पोबारा करण्याच्या अनेक घटना घडत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये नुकतीच अशी एक घटना घडली. मात्र, या घटनेतील नववधूला पळून जाताना पकडण्यात पोलिसांना यश आले व तिने सर्व हकीगत सांगितल्यानंतर लाखो रुपये घेऊन लग्न करून फसवणूक करणार्या टोळीचे रॅकेट उघडकीस आले आहे.

नेवासा तालुक्यातील साईनगर भागात राहणार्या एका तरुणाचे बर्याच दिवसांपासून लग्न जमत नव्हते. अखेर त्याला शारदा तनपुरे हिच्याकडे लग्नाकरिता मुलगी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधित तरुण हा आपल्या नातेवाईकांसह मुलगी पाहण्यासाठी गेला. मुलगी पसंत झाल्यानंतर लग्न करायचे ठरले व मुलीच्या घरच्यांना लग्नासाठी दोन लाख रुपये हुंडा दिल्यानंतर संबंधित तरुणाचे 3 नोव्हेंबरला लग्न झाले. 6 नोव्हेंबरला पत्नीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला संबंधित तरुण नेवासा येथे घेऊन आला, मात्र ती नेवासा येथून गुपचूप पळून गेली. पत्नीचा शोध घेत असतानाच संबंधित तरुणाला ती पोलीस ठाण्यात सापडली. यावेळी तिच्याकडे चौकशी केली असता तिने हे लग्न तिच्या साथीदारांच्या सांगण्यावरून केले असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिचे खरे नाव रुपाली पांडुरंग जगताप असल्याचे स्पष्ट झाले. हा गुन्हा शारदा तनपुरे, सागरबाई डवरे, मायावती चपाते, अनिल झिने यांच्या मदतीने केला असल्याची कबुली तिने दिली आहे. याप्रकाराने लग्नासाठी पैसे घेऊन मुलांना फसवणार्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे, यादृष्टीने तपास सुरू केला आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूर यांच्या पथकातील प्रदीप शेवाळे, भरत दाते, पोलीस कर्मचारी महेश कचे, सुहास गायकवाड, वसीम इनामदार, अशोक कुदळे, भागवत शिंदे, गणेश इथापे, बाळासाहेब खेडकर यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

