जयहिंद महिला मंच दिवाळीनिमित्त सैनिकांना देणार फराळ भेट
जयहिंद महिला मंच दिवाळीनिमित्त सैनिकांना देणार फराळ भेट
नगराध्यक्षा दुर्गा तांबेंच्या पुढाकारातून राबविला जातोय अभिनव उपक्रम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याने कायम राज्याला दिशादर्शक काम केले आहे. आपले घरदार सोडून देशवासीयांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय सैनिकांना जयहिंद महिला मंच, स्वराज्य सैनिक कल्याण संस्था यांच्यावतीने आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारासाठी दिवाळीचे फराळ भेट देण्यात येणार आहे. तसेच ज्या नागरिकांना जवानांना मिठाई भेट द्यायची आहे त्यांनी उच्च प्रतिची पॅकिंग स्वरुपातील मिठाई यशोधन कार्यालयात जमा करावी, असे आवाहन जयहिंदच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सहकार, शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रांत राज्यात अग्रगण्य ठरला आहे. पुरोगामी व समतेचा विचार जोपासत अनेक उपक्रम संगमनेरमध्ये सातत्याने राबवले जात आहेत. जिल्ह्यात सांस्कृतिक, वैभवशाली शहर ठरलेल्या तालुक्यात दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून मागील पाच वर्षांपासून दिवाळीनिमित्त जयहिंद महिला मंच, राजमाता जिजाऊ महिला मंडळ, एकविरा फाऊंडेशन, माऊली संस्था यांच्यावतीने भारतीय सैनिकांना फराळ देण्यात येते.

भारतीय सैनिक हे कायम आपल्या परिवारापासून हजारो किलोमीटर दूर असतात. सणासुदीच्या काळातही ते घरी येत नाही. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी कर्तव्यावर असतात. रात्रंदिवस, ऊन, वारा, पाऊस ते डोक्यावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडतात. त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करताना ज्या नागरिकांना सैनिकांना फराळ भेट द्यायचे आहे त्यांनी रविवार दि.8 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत यशोधन कार्यालयात पॅकिंग स्वरुपात पोहोच करावे. ते आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना भेट दिले जाणार आहे. याप्रसंगी वीरमाता अलका रहाणे, शारदा थोरात, वीरपत्नी सुनीता निघुते, वीरजवान संदीप उर्किडे आदिंसह तालुक्यातील आजी-माजी सैनिक उपस्थित राहणार आहेत.

