पोलिसांचे ‘दूर्लक्ष’ अन् सत्ताधार्‍यांचा ‘वादा’च ठरतोय जनतेचा फास! सत्ताधार्‍यांना ‘हंड्रेड डेज’च्या आश्वासनांचा विसर; सिग्नल असूनही ‘बळी तो कानपिळी’चाच कारभार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृतवाहिनीच्या तीरावर वसलेले आणि ऐतिहासिक व्यापारपेठेचा वारसा लाभलेले संगमनेर शहर आज वाहतुकीच्या भीषण विळख्यात अडकले आहे. एकीकडे ‘स्मार्ट सिटी’च्या वल्गना केल्या जात असताना, दुसरीकडे मात्र शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक ‘अराजकतेचे’ अड्डे बनले आहेत. दोन आमदारांच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत संगमनेरच्या विकासाचा टेंभा मिरवला जात असला, तरी सर्वसामान्य संगमनेरकर मात्र दररोज रस्त्यावर मृत्यूशी आणि मानसिक त्रासाशी झुंज देत असल्याचे वास्तव शहरातंर्गत रस्त्यारस्त्यावर दिसत आहे. मात्र या समस्येकडे लक्ष द्यायला ना पोलिसांना सवड आहे, ना पालिकेच्या सत्ताधार्‍यांना. त्यांचा हा अक्षम्यपणा मात्र सर्वसामान्यांसाठी फास ठरत आहे.


नगरपालिकेच्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीने शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करु, शंभर दिवसांत शहराला शिस्त लावू अशी भरपूर आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात मात्र, सत्तेची खुर्ची मिळताच सत्ताधार्‍यांना या आश्वासनांचा विसर पडल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी अर्धवट स्वरुपात राबवलेल्या माहीमेनंतर आता शहरातील सर्वच अंतर्गत रस्त्यांवर पुन्हा एकदा अतिक्रमणांचे ‘भूत’ संगमनेरकरांच्या मानगुटावर बसले असून, रस्ते अरुंद झाले आहेत. राजकीय वरदहस्त असलेल्या अनधिकृत रिक्षाथांब्यांनी शहराचे ‘सौंदर्य आणि शिस्त’ दोन्ही पायदळी तुडवली आहे. संगमनेरकरांना शिस्त लावण्याऐवजी आपली ‘व्होट बँक’ जपण्यातच सत्ताधारी धन्यता मानत असल्याचे संतापजनक चित्र सध्या संगमनेरात दिसत आहे.


तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने शहरात तिन ठिकाणची बंद सिग्नल व्यवस्था सुरु करण्यात आली. पण या गोष्टीला आता वर्ष उलटत असतानाही ती व्यवस्था शोभेची वस्तूच बनून राहीली आहे. अकोले नाका आणि बसस्थानक परिसरातील सिग्नलकडे पाहून वाहनधारक आता हसू लागले आहेत. पोलिसांच्या अनुपस्थितीत लाल दिवा लागूनही कोणताच वाहनधारक त्याकडे बघत नसल्याने शहरात नियम पाळण्याची भीतीच उरलेली नाही. तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी दिलेले आदेश हवेत विरले आहेत. शहरातून वाहतूक पोलीस गायब झाले असून, जे उरले आहेत ते केवळ दंड वसुलीपुरतेच दृष्टीत पडत असतात. बेशिस्त वाहनधारकांकडून दररोज सिग्नलचा फज्जा उडवला जात असतानाही पोलीस केवळ ‘मूक दर्शका’च्या भूमिकेतच असल्याने शहरातून संतापही व्यक्त होत आहे.


नाशिक, पुणे आणि मुंबई या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांचा संगम असलेल्या या शहराचे भौगोलिक महत्त्व ओळखून नियोजन व्हायला हवे होते. मात्र, दूरदृष्टीच्या अभावामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ आता गचाळ झाली आहे. भररस्त्यात चारचाकी वाहने उभी करुन जाणार्‍या मुजोर वाहनधारकांमुळे रुग्णवाहिकांनाही रस्ता मिळणे अवघड झाले आहे. शहराच्या विकासाचे दावे करणार्‍या लोकप्रतिनिधींना हे वास्तव दिसत नाही का? असा संतप्त सवालही त्यातून विचारला जात आहे.


जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना कडक शिस्तीसाठी ओळखले जाते. संगमनेरच्या विस्कळीत झालेल्या वाहतूक यंत्रणेला आता त्यांच्याकडूनच मोठ्या अपेक्षा आहेत. बंद पडलेली वाहतूक शाखा पुन्हा कार्यान्वित करुन, राजकीय दबावाला बळी न पडता ठोस कारवाईची गरज आहे. अन्यथा, संगमनेरचे रस्ते केवळ अपघातांचे आणि वादांचे केंद्र बनून राहतील हे मात्र निश्‍चित.


तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुंडाळल्या गेलेल्या जिल्ह्यातील वाहतूक उपविभागांना नवसंजीवनी देत त्या पुन्हा कार्यान्वीत केल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात जिवंत झालेल्या संगमनेर उपविभागात सहाय्यक निरीक्षक गोपाळ उंबरकर, पप्पू कादरी या सारख्या निरीक्षकांनी पथदर्शी काम करुन या शाखेचे महत्त्वही अधोरेखीत केले होते. मात्र कोविड संक्रमणाच्या काळात जिल्ह्यातील वाहतूक शाखा गुंडाळण्यात आल्या, त्या आजही त्याच अवस्थेत आहेत. नूतन पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी या गंभीर विषयाकडे तितक्याच गांभीर्याने पाहून त्यावर उपाय काढण्याची अपेक्षा आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 1786227

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *