2024 साली महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्तेवर येईल ः नायडू अकोले येथे भाजप महिला मोर्चाची बैठक उत्साहात संपन्न

नायक वृत्तसेवा, अकोले
2024 साली भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेवर येईल. अन आघाडी सरकारची बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रोहिणी नायडू यांनी केला.

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा उत्तर नगर जिल्हा आयोजित समर्थ बुथ अभियान कार्यकारिणीची बैठक अकोले शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानाहून नायडू बोलत होत्या. या बैठकीस भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे, महिला मोर्चा प्रदेश सदस्या सोनाली कुलकर्णी, महिला मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, संघटक वंदना गोंदकर, कोपरगाव तालुकाध्यक्ष शरद थोरात, अकोले तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

देशात आपले सरकार असून राज्यातही आपलेच सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावा. महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी अधिकतम लक्ष घालण्याची गरज आहे. बुथ बळकटीकरण करताना पुरुषांबरोबर महिलांचाही सहभाग दिसून आला पाहिजे. त्यामुळे मोदी सरकारची ध्येय धोरणे आपल्या घराघरांपर्यंत पोहोचवता येतील, असे प्रदेश सचिव रोहिणी नायडू म्हणाल्या.

प्रास्ताविकात जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील बुथची आकडेवारी मांडली. तसेच महिलांना राजकारणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून महिला बचतगटांचे अहमदनगर जिल्ह्यात जाळे उभारुन महिलांचे खर्‍या अर्थाने सबलीकरण करू. तसेच ज्या महिलांवर अन्याय-अत्याचार होईल त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरू, असे नाईकवाडी म्हणाल्या. या बैठकीस सुप्रिया धुमाळ, लता देशमुख, मंदा बराते, पुष्पा भांगरे, आरती पठाडे, वैशाली जाधव, वैशाली साळुंखे, वैशाली आढाव, अंजली सोमणी, राजश्री माने, पुष्पा वाणी आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी करुन आभार मानले.

Visits: 319 Today: 1 Total: 1425110

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *