शिर्डीत पुन्हा ‘गद्दारी’चा प्रयोग की सत्तेसाठी ‘कोलांटउडी’? खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या ‘शिंदेशाही’ भोजनाने जिल्ह्याच्या राजकारणात संशय..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या ‘डिनर डिप्लोमसी’ला लावलेली हजेरी, ही केवळ जेवणाची पंगत नव्हती, तर तो ठाकरे सेनेच्या पाठीत खुपसलेला ‘राजकीय खंजीर’ असल्याची चर्चा आता अहिल्यानगर जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात सुरू झाली आहे. ज्या मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या नावावर आणि सहानभूतीवर वाकचौरेंना डोक्यावर घेतले, त्याच मतदारांच्या विश्वासाला तडा देण्याचे काम ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून सुरू झाले आहे. त्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्द आता फक्त शब्दकोशापुरता उरला आहे की काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.


खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या राजकारणाची शैली पाहता ‘सत्ता असेल तिथे वाकचौरे’ असेच समीकरण आजवर राहिले आहे. कधी काँग्रेस, कधी शिवसेना, कधी भाजप आणि पुन्हा शिवसेना असा त्यांचा प्रवास हा विचारधारेपेक्षा ‘संधीसाधूपणा’वर अधिक आधारलेला दिसतो. दोन मोठ्या पराभवानंतर राजकीय विजनवासात गेलेल्या वाकचौरेंना उद्धव ठाकरेंनी पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी दिली, हेच मुळात अनेकांना न पटणारे होते. पण तरीही ‘मशाल’ हाती घेऊन शिर्डीच्या शिवसैनिकांनी जीवाचे रान केले आणि त्यांना दिल्लीत पाठवले. मात्र, दिल्लीत पोहोचताच वाकचौरेंनी पक्षप्रमुखांच्या आदेशाला ‘केराची टोपली’ दाखवत शिंदे गटाच्या पंगतीला बसणे पसंत केले. ही उपस्थिती अनपेक्षित नाही, तर ती एका मोठ्या राजकीय भूकंपाची ‘पूर्वसूचना’ आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच झालेली दिल्लीवारी आणि त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेले रात्रीभोज हे ‘ऑपरेशन टायगर’चाच भाग असल्याचे आता स्पष्ट होत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील उरले-सुरले खासदार फोडून त्यांना महायुतीकडे वळवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. शिर्डीचे खासदार या जाळ्यात सहज अडकले की त्यांनी स्वतःहून साकडे घातले? हा प्रश्न आता जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठरतोय. जाधव यांनी यापूर्वीही अशीच ‘डिनर डिप्लोमसी’ राबवून आमदार-खासदार फोडले होते. आता पुन्हा एकदा तोच प्रयोग होत असताना वाकचौरेंचे तिथे असणे, हे शिर्डीच्या स्वाभिमानी मतदारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.


अहिल्यानगर जिल्हा हा सहकार आणि राजकारणाची पंढरी मानला जातो. येथे विखे-पाटील आणि थोरात यांच्यातील संघर्षात नेहमीच तिसरा गट आपली पोळी भाजून घेतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. पण जेव्हा लोकप्रतिनिधीच डळमळीत विचारांचे असतात, तेव्हा कार्यकर्त्यांचे नीतिधैर्य खचते. शिर्डीच्या जनतेने 2009 पासून शिवसेनेवर (ठाकरे गट) विश्वास कायम ठेवला होता. अगदी शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतरही शिर्डीचा बालेकिल्ला ढासळला नव्हता. मात्र, आता खासदारांच्या भूमिकेमुळे सामान्य शिवसैनिक गोंधळात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिले असतानाही, आष्टीकर आणि देशमुख यांच्यासह वाकचौरेंनी केलेली ही ‘बंडखोरी’ म्हणजे मातोश्रीला दिलेले खुले आव्हान आहे.


वाकचौरेंचा आजवरचा इतिहास पाहता, ते ‘ऑपरेशन टायगर’चे पहिले शिकार ठरतात की शिकारी, हे लवकरच स्पष्ट होईल. दिल्लीत शिजलेले हे ‘राजकीय राजकारण’ शिर्डीच्या मातीत कोणते पीक घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भाऊसाहेब वाकचौरेंसाठी ही केवळ एक मेजवानी असेल, पण ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर शिर्डीचा खासदार पुन्हा एकदा सत्तेच्या लोभापायी आपली निष्ठा विकत असेल, तर नगर जिल्ह्याच्या राजकारणात असा भूकंप होईल, ज्याचे धक्के मातोश्रीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत.

Visits: 43 Today: 4 Total: 1729321

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *