भाजप कार्यकारिणीच्या निवडीत माझी एकट्याची भूमिका नाही ः गोंदकर
भाजप कार्यकारिणीच्या निवडीत माझी एकट्याची भूमिका नाही ः गोंदकर
213 बूथ प्रमुख राजीनामे प्रकरण; लवकरच मतभेद दूर होण्याचा विश्वास
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर भाजपच्या कार्यकारिणी निवडीत माझी एकट्याची भूमिका नाही. पक्षाने प्रदेशस्तरावरून या निवडी केल्या असून पक्षातील प्रामाणिक लोकांना त्यात स्थान देण्यात आले आहे, असे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पक्ष संघटनेत आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र लवकरच मतभेद दूर होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

पक्षाने नुकतीच तालुकाध्यक्षपदी बबन मुठे तर शहराध्यक्षपदी मारुती बिंगले यांची निवड केली आहे. नवीन कार्यकारिणी जाहीर केली. या निवडीचा निषेध करत 231 पैकी 213 बूथ प्रमुखांनी तर 44 शक्ती केंद्र प्रमुखांनी पदाचे राजीनामे दिले. त्यासाठी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात मेळावा आयोजित केला. त्यात नगरसेवक किरण लुणिया व अभिजीत कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यावर गंभीर आरोप केले. कार्यकारिणी निवडीत निष्ठावंतांना डावलण्यात आले. ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविला त्यांना कोणतेही स्थान देण्यात आले नाही. जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी श्रीरामपुरात पक्ष संपविला असा आरोप यावेळी करण्यात आला. पक्षाच्या घटनेविरूद्ध जाऊन निवडी करण्यात आल्या. ज्या पदाधिकाण्यांमागे कार्यकर्ते नाहीत त्यांना महत्वाच्या पदावर स्थान देण्यात आले. जिल्हाध्यक्ष गोंदकर यांचाच त्यामागे हात असल्याची टीका करण्यात आली.

याबाबत माध्यमांनी गोंदकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी लवकरच सर्व पदाधिकार्यांचे गैरसमज दूर करू असे सांगितले. श्रीरामपुरातील कार्यकारिणीमध्ये निवडले गेलेले पदाधिकारी हे संघटनेतील आहेत. कोणीही बाहेरचा कार्यकर्ता नाही. निवडीचे अधिकार एका व्यक्तीला दिलेले नसतात. सामूहिकपणे निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे माझ्याविरूद्ध करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. भाजपच्या प्रदेशस्तरावर या सर्व प्रकाराची कल्पना देण्यात आली आहे. त्यांनी श्रीरामपुरात बूथ प्रमुखांना दिलेल्या राजीनाम्याबाबत विचारणा केली तर सविस्तर अहवाल सादर करू, असे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष गोंदकर शेवटी म्हणाले.

