एम्लाॅइज क्रेडीट सोसायटीने सभासदांचे हित जोपासले : डॉ.विखे पाटील

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी येथील श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काढले.

संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली निमित्त सभासदांंना भेट देण्यात आली.त्याचा वितरण उपक्रमाचा शुभारंभ डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी कमलाकर कोते, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार, उपाध्यक्ष पोपट कोते, संचालक मंडळ सदस्य, सोमनाथ डोळे तसेच कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले, विरोधकांनी गेल्या पंचवीस वर्षांत विखे पाटील परिवाराच्या विरोधात अनेक प्रयत्न केले, पण आमदारपद आजही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडेच आहे. हा बाबांचा निर्णय होता आणि बाबांचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर बोलतांना त्यांनी स्पष्ट सांगितले, बाबांना सगळं माहीत असतं. ते परिस्थिती पाहून निर्णय घेतात. अध्यक्ष कोण झाला हे गौण आहे, पण शिर्डीचा विकास हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार आहेत यात शंका नाही.

डॉ. विखे म्हणाले, ५९८ कर्मचाऱ्यांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. दुर्दैवाने याचिका करणारे आपल्यातीलच काही कर्मचारी आहेत. आपल्याला समजून घ्यायचं आहे की कधी कधी शत्रू बाहेर नसतो घरातच असतो. पण मी या कर्मचाऱ्यांसोबत आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे असा विश्वास त्यांनी दिला.
देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अलीकडील शिर्डी दौऱ्याचा उल्लेख करतांना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, देशाचे गृहमंत्री एका दिवशी चार ठिकाणी गाडीतून उतरले.दर्शन घेतले, सभा घेतल्या, जेवण केले ही गोष्ट सगळ्यांच्या नशिबात नसते. ही आमची पुण्याई आहे. जोपर्यंत बाबांचा आशीर्वाद आमच्यावर आहे, तोपर्यंत कुणीही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही असे ते यावेळी म्हणाले.

शिर्डीच्या गोरगरीब जनतेने आम्हाला कधीच सोडलं नाही. आम्ही त्यांना बंगले दिले नाहीत, नोकऱ्या दिल्या नाहीत, पण त्यांनी आमच्यावर अपार विश्वास ठेवला. जोपर्यंत हे लोक आमच्यासोबत आहेत, तोपर्यंत ना. विखे पाटील यांना कोणीही हरवू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, पण शिर्डीच्या विकासासाठी आपण सगळे एकत्र राहू या असेही ते म्हणाले.

Visits: 45 Today: 1 Total: 1102764
