शरद पवारांमुळे मी ‘रयत’ चा भाग झालो : देशमुख

नायक वृत्तसेवा, आश्वी
अकोले तालुक्यातील आदिवासी पाड्यात मी जन्मलो. चिकाटी व संयमाच्या जोरावर आयएएस परीक्षा पास केली. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व महानगरपालिकेत जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण खऱ्या अर्थाने समाजसेवेची खरी संधी मला रयत शिक्षण संस्थेत मिळाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रेरणेने आज मी संस्थेचा भाग झालो अशा शब्दांत रयत शिक्षण संस्थेचे सचिव व माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल व महाविद्यालयात आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंती सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून विकास देशमुख बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, रयत शिक्षण संस्था आज १६ जिल्ह्यांत व कर्नाटकात अशा एकूण ७४२ शाखांमधून ६ लाख २० हजार विद्यार्थ्यांना १५ हजार कर्मचारी शिक्षण देत आहेत. हा प्रवास म्हणजे गरीबांच्या स्वप्नांना पंख देणारा समाजपरिवर्तनाचा इतिहास आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पत्रकार वैभव ताजणे यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना लहानपणापासून दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून इंग्रजी माध्यमाची ज्युनियर व सीनियर केजी सुरू करावी अशी मागणी देशमुख यांच्याकडे केली. त्यावर देशमुख यांनी त्याचे स्वागत करत ठराव संस्थेकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.यावेळी विभागीय अधिकारी बाळासाहेब नाईकवाडी,प्रमोद तोरणे, प्राचार्य देवराम वडितके, पर्यवेक्षक दिपक चव्हाण, बाळकृष्ण होडगर, सुभाष म्हसे, ॲड. अशोक बोरा, सुमतीलाल गांधी, सुशील भंडारी, बाळासाहेब गायकवाड,राहुल जऱ्हाड, गोरक्षनाथ बनकर,सेवानिवृत्त प्राचार्य गमे,सरपंच नामदेव शिंदे,वैभव ताजणे, अनिल मुंन्तोडे,शिक्षक रमेश थेटे, अनिता गाडे, सुवर्णा वाकचौरे, मोहन घिगे, राजेंद्र बर्डे, वैशाली सोसे, उषा घिगे, हरिभाऊ कोकाटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यात वकिली व्यवसाय करणारे आश्वी बुद्रुकचे भुमीपुत्र ॲड. अशोक बोरा यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. अनावश्यक खर्च टाळून तो निधी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वापरावा असा संदेश त्यांनी दिला.

Visits: 94 Today: 1 Total: 1420933
