निधीची काळजी करणाऱ्यांनी भाच्याला जाब विचारावा : घोरपडे

नायक वृत्तसेवा, संगमनेर  
रस्त्यांची काम रद्द करण्याचा निर्णय एकट्या संगमनेर तालुक्याचा नसून,अन्य  जिल्ह्यातील तालुक्याच्या बाबतीत सुध्दा आहे.निर्णय राज्य सरकारचा असून व्यक्तिगत आ.अमोल खताळ यांचा संबंध नाही. तरीही आमदार अमोल खताळ यांच्यावर टिका करून  थयथयाट करणारे माजी आमदार बाळासाहेब थोरात त्यांची जाणीवपुर्वक बदनामी करीत आहेत.एवढीच जर निधीची काळजी असेल तर रद्द झालेल्या कामाबाबत  आपल्या भाच्याला जाब का विचारत नाहीॽ असा सवाल शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोन संशोधन व विकास अंतर्गत ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मंजूर झालेल्या रस्तांच्या  कामाची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील कामांचीच प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय शासनाचा आहे.तो व्यक्तिगत आ.अमोल खताळ यांचा कुठेही संबंध नाही.राज्य सरकारने अन्य जिल्ह्याकरीता सुध्दा हीच भूमिका घेतली असल्याची माहीती जेष्ठ नेत्यांनी करून घ्यावी. मात्र उठसूठ आपले अपयश झाकण्यासाठी आ.अमोल खताळ यांच्यावर टिका करून वेळ मारून नेणारे माजी आ. थोरात सरकारच्या निर्णयाबाबत आपल्या भाच्यांना जाब विचारत नाही. इतरवेळी न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायलाही पुढे असलेले थोरात  यांनी जबाबदार लोकप्रतिनीधी आणि वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून आ.सत्यजीत तांबे यांनाही याबाबत विचारणा केली तर त्यांचा गैरसमज दूर होईल.
आ.अमोल खताळ यांनी तालूक्यातील विकास कामा करीता मोठा निधी मंजूर करून आणला आहे.अनेक वर्ष न झालेल्या रस्त्यांची काम आता पूर्णत्वास जात असल्याने माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अपयशाची चर्चा ग्रामीण भागात होत आहे.आ.खताळ यांच्या कामाच्या पाठपुराव्याचे कौतुकही सामान्य माणूस करू लागल्याने याचे मोठे शल्य त्यांना आहे.
अवघ्या आठ नऊ महीन्यांची आ. खताळ यांची कारकीर्द सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली हे देखवत नसल्यानेच उठसूठ व्यक्तिगत बदनामी करण्याशिवाय थोरातांकडे कोणाताही पर्याय राहीलेला नाही.अपयशी कारकीर्दीचा पराभव करून कामातून कर्तव्य सिध्द करणाऱ्या आ.खताळ यांना सामान्य माणसांची मिळ्णारी सहानूभूती खूप मोठी आहे.त्यांच्यावर व्यक्तिगत टिका करून माजी आमदार थोरात स्व:ताचे हसू करून घेत आहेत.मात्र रद्द झालेली कामे पुन्हा मंजूर होण्यासाठी आ.अमोल खताळ निश्चित सरकारकडे पाठपुरावा करतील असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच ग्रामविकस मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कामे पुन्हा मंजूर करण्यासाठी आ.खताळ यांचे प्रयत्न सातत्याने राहतील असे विठ्ठल घोरपडे यांनी पत्रकात शेवटी सांगितले आहे.
रद्द झालेल्या रस्त्यांच्या कामामध्ये माझा कोणताही संबंध नाही. निर्णय का घेतला याची माहीती घ्यावी लागेल.कामा संदर्भात माझा सातत्याने पाठपुरावा होता.प्रशासकीय स्तरावर  काही त्रृटी असतील तर  त्याची चौकशी करून सुधारणा करता येईल.मात्र काहीचा स्वार्थ यामध्ये दडला असेल तर तेही काळाच्या ओघात समोर येईलच असे आ.अमोल खताळ यांनी या विषयावर बोलतांना सांगितले.
Visits: 116 Today: 1 Total: 1418834

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *