बॉम्बस्फोट निकालावर संगमनेरात जल्लोष

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी तब्बल सतरा वर्षांनंतर अखेर पूर्ण झाली. विशेष एनआयए न्यायालयाने सुनावणी दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे संगमनेर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी संगमनेर बस स्थानक परिसरात आनंद व्यक्त करत जल्लोष केला.

भाजपाच्या शहराध्यक्षा पायल आशिष ताजणे यांनी याबाबत भावना व्यक्त करतांना म्हटले की, तत्कालीन काॅंग्रेस सरकारने मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक बदनाम केले मात्र आमचा न्यायदेवता व संविधानावर पुर्णपणे विश्वास होता, या तब्बल सतरा वर्षांनंतर आज न्याय मिळाल्याने आनंद व्यक्त करत आहोत.कोणताही आरोप सिद्ध झाला नाही, कोणताही पुरावा नाही म्हणून सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायव्यवस्थेनेच दाखवून दिले की आतंकवाद हा भगवा नव्हताच आणि यापुढेही नसणार असे मत ताजणे यांनी मांडले आहे.

Visits: 121 Today: 1 Total: 1412927
