वंजारी समाजाच्या प्रश्नांवर चिंतन होणे गरजचे : डॉ.ढाकणे

नायक वृत्तसेवा, नाशिक
वंजारी समाज प्रगत व्हावा, यासाठी समाजाच्या न्याय हक्काच्या प्रश्नावर चिंतन होणे गरजेचे असल्याचे सांगून समाजाचे प्रश्न शासन दरबारी अवगत व्हावेत, यासाठी चिंतन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन वंजारी समाजसेवा प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष डॉ.एकनाथ ढाकणे यांनी केले.

वंजारी समाजाचा चिंतन मेळावा व राष्ट्रसंत भगवान बाबा यांची १२९ वी जयंती मंगळवारी नागपंचमीच्या दिवशी नाशिकच्या तपोवन परिसरातील लक्ष्मी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. त्यावेळी उपस्थित समाज बांधवांना अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करतांना डॉ.एकनाथ ढाकणे बोलत होते. व्यासपीठावर माजी आ.बाळासाहेब सानप,दादासाहेब मुंडे,सुधाकर गर्जे,तुकाराम सांगळे,शशिकांत घुगे,नामदेव सानप,शामराव गीते,माया बुरकुल,विनोद केकाण,ॲड. सुरेश आव्हाड,सुरेश सांगळे,रामनाथ आव्हाड,भाऊसाहेब सानप यांच्यासह महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आदी राष्ट्रीय व राज्यस्तरीय वंजारी समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या १६ समाज बांधवांना डॉ. एकनाथ ढाकणे आणि माजी आ. बाळासाहेब सानप यांच्या हस्ते राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रस्ताविक तुकाराम सांगळे यांनी केले.स्वागत शामराव गीते, माया बुरकुल,नामदेव सानप यांनी तर आभार शामराव गीते यांनी मानले.

राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती आणि पुण्यतिथी महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे साजरी करावी, वंजारी समाजाचे दोन टक्के जे आरक्षण आहे.ते अतिशय तुटपुंजे आहे, त्यामध्ये वाढ व्हावी, नाशिक येथील महामार्ग बसस्थानकांचे क्रांतिवीर वसंतराव नाईक नामकरण करावे, नाशिक ते भगवानगड तात्काळ लालपरी बस दैनंदिन सुरू करावी, वंजारी समाजाच्या न्याय प्रश्नासाठी आणि समाजाला उन्नत बनवण्यासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ तात्काळ सरकारने गठीत करावे असे ठराव या चिंतन शिबिरात पारित करण्यात आले.

Visits: 194 Today: 2 Total: 1597520
