सी.ई.टी परीक्षाप्रकरणी दोषीवर कारवाई करा : आ. खताळ विषयतज्ञांना नोटीस बजावल्याचे मंत्री पाटील यांचे उत्तर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षा मार्फत २८ हजार ८३७ विद्यार्थ्यांसाठी , ४ मे २०२५ रोजी एमएचटी-सीईटी ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेमधील तब्बल २१ प्रश्न चुकीचे आले होते, त्यामुळे ही परिक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला.या प्रश्नांकडे आ. अमोल खताळ व इतर विधानसभा सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी फेरपरीक्षा घेण्यात आली होती.या प्रकरणी संबंधित विषय तज्ञांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्या अनुषंगाने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील एका परिक्षा केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या प्रश्न पत्रिकेतील सुमारे २० ते २५ प्रश्नांमध्ये चारही पर्याय चुकीचे असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी चुकीचे पर्याय निवडले व याबाबत त्यांनी परिक्षा केंद्राकडे तक्रार केली असता कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे निदर्शनास आले असल्याबाबत आमदार.अमोल खताळ यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत या प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली. व यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर काय कारवाई केली.हे सभागृहाला सांगावे असा प्रश्न आमदार खताळ यांनी सभागृहात उपस्थित केला.

आमदार अमोल खताळ आणि इतर विधानसभा सदस्यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी २०२५ ही सामाईक प्रवेश परीक्षा पीसीबी आणि पीसीएम ग्रुपकरीता ९ एप्रिल, २०२५ ते दि. २७ एप्रिल, २०२५ या कालावधीत २८ सत्रात घेण्यात आली होती. त्या २८ सत्रांपैकी २७ सत्रांमध्ये ६, लाख ७७, हजार ५६० उमेदवारांची परीक्षा सुरळीत पार पडली. २७ एप्रिल २०२५ रोजीच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी, मराठी आणि उर्दू या भाषेमध्ये घेण्यात आलेल्या पीसीएम ग्रुपच्या परीक्षेदरम्यान २७ हजार,८३७ विद्यार्थी उपस्थित होते. गणित विषयाशी संबंधित इंग्रजी भाषातील २१ प्रश्नांमध्ये चूका असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. मराठी व उर्दू प्रश्नांमध्ये कोणतीही त्रुटी अथवा चूक नव्हती. इंग्रजी भाषांतरामध्ये त्रुटी, चुका आढळल्याने ज्या विद्यार्थ्यांनी. २७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा दिलेली होती, अशा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुन्हा ५ मे, २०२५ रोजी फेर परीक्षा घेण्यात आली. ही फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले

भारतातून अमेरिकेला निर्यात केलेला ४ कोटी २८ लाख रुपये किंमतीचा आंबा कागदपत्रातील त्रुटीमुळे अमेरिकेतील व्यापाऱ्यांनी स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे तो आंबा पुन्हा आणणे शक्य नव्हते, त्यामुळे तो अमेरिकेतच नाहीसा करावा लागला. यातून या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या प्रश्नाकडे आ. अमोल खताळ यांनी लक्ष वेधले. त्यावर विपणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची चौकशी करून नुकसान भरपाईच्या रकमेबाबतची खातारजमा करण्यात येत आहे.

Visits: 164 Today: 2 Total: 1592109
